एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले

मुंबईमधील सिव्हर ओक या शरद पवरांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी उघडपणे व्यक्त केली नाराजी

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे राजकीय बंडासंदर्भातील माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाकडून मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात अपयश आलं. याचसंदर्भात पवारांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचं संरक्षण असणाऱ्या राजकारणी एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात गेल्यास त्यांच्यासोबत असणाऱ्या विशेष सुरक्षा दलामधील व्यक्तींनी यासंदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देणं बंधनकारक असतं. मात्र विरोधाभास म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री संभुराजे देसाई सुद्धा बंडखोर आमदारांमध्ये असून ते सुद्धा सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये आहेत.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

बुधवारी दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेठ घेतली. मुंबईमधील सिव्हर ओक या शरद पवरांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये वळसे-पाटील यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचे समजते. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत असणारे पवार हे मंगळवारी सायंकाळीच मुंबईत परतले. गुप्तचर विभागाला आमदार गुजरातमध्ये गेल्याची माहिती न मिळाल्याच्या मुद्द्यावरुन पवारांनी कठोर शब्दांमध्ये या बैठकीदरम्यान संताप आणि नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra Breaking News Live : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

“पवार या साऱ्या प्रकरणामुळे फार नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षाच्या नेत्यांना काळवली आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाने सरकारला यासंदर्भात का इशारा दिला नाही याबद्दल पवारांनी आश्चर्य व्यक्त केलंय. खास करुन एवढ्या मोठ्या संख्येने आमदार आणि मंत्री रस्ते मार्गाने बाहेर जात असतानाही माहिती न मिळाल्याबद्दल पवारांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलंय,” अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

“पोलिसांनी या नेत्यांना सुरक्षा पुरवली आणि पोलिसांकडे शस्त्र होती. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना यासंदर्भात माहिती देणं अपेक्षित होतं. यामुळे इतर राज्यात काही गोंधळ निर्माण होऊ नये या हेतूने ही माहिती देणं अपेक्षित असतं,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

एवढ्यामोठ्या प्रमाणात शिवसेनेचे बंडखोर आमदार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेले असतानाही महाविकास आघाडी सरकारमधील नेतृत्व करणाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याबद्दल पवारांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केल्यांचं सूत्रांनी स्पष्ट केलंय.