कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा उत्तराखंडला इशारा; दररोज १० ते १२ भाविक पॉझिटिव्ह

शाही स्नानानंतर करोनाचा उद्रेक होण्याची भीती

उत्तराखंडमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर करोनाचं सावट गडद होताना दिसत आहे. राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला आहे. दररोज १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून येत असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्राने उत्तराखंड सरकारला इशारा दिला आहे.

देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच्या काळातच कुंभमेळा होत असल्याने केंद्र सरकार सतर्क झालं आहे. हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या लोकांसाठी करण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधांची केंद्रीय पथकाने पाहणी केली. या पाहणीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंडच्या सचिवांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याचा इशारा दिला आहे.

हे वाचले का?  सात कोटींची जमीन फक्त ३.७५ लाखांत मिळाली; महिलेसाठी कायदेशीर लढा ठरला भलताच फायदेशीर!

हरिद्वारमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याला १२ राज्यांतून भाविक येऊ शकतात. तर दुसरीकडे कुंभमेळा जवळ येत असतानाच दररोज १० ते १२ स्थानिक नागरिक आणि १० ते २० भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत, असं केंद्रीय पथकानं नमूद केलं आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर स्थानिकांमध्ये करोनाचं संक्रमण होऊन उद्रेक होऊ शकतो,” केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी उत्तराखंडच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

हे वाचले का?  Nita Ambani on Olympics in India: नीता अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर कार्ती चिदम्बरम म्हणाले, “हे तर मोठं संकट ठरेल”; वाचा नेमकं काय झालं?

रुग्ण आढळून येत असल्याने पॉझिटिव्ही रेट वाढण्याची भीती आहे. मोठ्या प्रमाणात भाविक राज्यात येणार आहेत, त्यामुळे दिवसाला ५० हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि ५ हजार आरटीपीसीआर चाचण्या पुरेशा नाहीत. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करोना चाचण्या वाढवण्यात याव्यात. त्याचबरोबर भाविकांबरोबरच स्थानिक नागरिकांच्याही चाचण्या करण्यात याव्यात, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तराखंड सरकारला सांगितलं आहे.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी