जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुळात मराठा समाजाने…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच इथं सरकार चुकलं हे निश्चित, असं म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले, “या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती.”

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

“…त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित”

“अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “राहता राहिला प्रश्न या संवेदनशील विषयाचा, तर याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं.”

“शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत”

“मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यांनी करू नयेत,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीवर काळ्या झेंड्यांचे सावट

https://platform.twitter.com/embed/Tweet.html?

“काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे, पण…”

राज ठाकरे म्हणाले, “काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे, पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे.”

“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे…”

“माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्चांचा आदर्श घालून दिला आहे, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि यापुढे पण राहील,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”