ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार शिराळकर कालवश

राज्यात शेतमजूर, शोषित, श्रमिक, दलित यांच्या उत्थानासाठी त्यांनी सामाजिक चळवळीत वाहून घेतले.

नाशिक : आदिवासी, शेतमजूर यांना न्याय मिळावा यासाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य कॉम्रेड कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री दीर्घ आजाराने नाशिक येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. 

कॉम्रेड शिराळकर काही दिवसांपासून कर्करोगाने आजारी होते. माकप कार्यकर्त्यांच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मूळचे मिरजेचे असणारे शिराळकर यांनी पवई आयआयटीतून सुवर्णपदक मिळविले होते. मार्क्‍सवादाने ते प्रभावित होते. मुंबईत असताना युवक क्रांती दलात त्यांचा सहभाग होता. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील अंबरसिंह महाराजांच्या संपर्कात येऊन ते माकपशी जोडले गेले. मार्क्‍सवाद केवळ वाचनापुरताच मर्यादित न ठेवता त्यांनी तो कृतीत आणला. २०१४ पर्यंत पक्षाच्या राज्य आणि केंद्रीय समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली माकपचे शिष्टमंडळ चीनला गेले होते. त्यात शिराळकर यांचा समावेश होता.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

राज्यात शेतमजूर, शोषित, श्रमिक, दलित यांच्या उत्थानासाठी त्यांनी सामाजिक चळवळीत वाहून घेतले. या समाज घटकांशी संबंधित अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. ‘उठ वेडय़ा, तोड बेडय़ा’ ही त्यांची पुस्तिका विशेष गाजली. जातीअंताची लढाई, महाराष्ट्रातील साखर उद्योग, ऊस शेती आणि ऊस तोडणी कामगारांचे प्रश्न, वनाधिकार कायद्याची मीमांसा, आदिवासींचे जीवन, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा आणि धर्माधतेचे राजकारण आदी विषयांवर शिराळकर यांनी लेखन केले. पुण्यातून चालणाऱ्या मागोवा गटाचे ते सदस्य होते. धुळे जिल्ह्यातील आदिवासी, शेतमजूर यांच्यावरील शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठविला. आदिवासींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. बरीच वर्षे ते नंदुरबार, धुळय़ात कार्यरत होते. त्यामुळे या जिल्ह्यातील आदिवासींमध्ये ते कुमारभाऊ म्हणून ओळखले जात. याच जिल्ह्यातील मोड गावी सोमवारी दुपारी चार वाजता शिराळकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यात ‘एलडीओ’ नावाखाली डिझेलची अवैध विक्री; पेट्रोलपंप चालकांचा बंदचा इशारा

कार्यकर्ता लेखक..लोकचळवळींना प्रेरणा देणारे लेखक म्हणूनही कुमार शिराळकर परिचीत होते. ‘ऊठ वेडय़ा, तोड बेडय़ा’ हे त्यांचे पुस्तक अनेक कार्यकर्त्यांना घडवणारे ठरले. ऊसतोड मजूर, पाणीवाटप, ग्रामीण रोजगार आणि बेरोजगारी हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. बाबा आमटे यांच्याशी त्यांचे राजकीय विचार कधी जुळले नसले तरी कार्यप्रेरक म्हणून आमटे यांच्याबद्दल त्यांना आदर होता. अलीकडेच, ‘नवे जग, नवी तगमग’ हे त्यांचे आत्मपर पुस्तक प्रकाशित झाले. ‘लोकसत्ता’सारख्या दैनिकाखेरीज, साधना, इकॅानॉमिक अ‍ॅण्ड पॉलिटिकल वीकली अशा साप्ताहिकांतूनही त्यांनी लेखन केले.

हे वाचले का?  RTE Admission 2024: पहिल्या सोडतीनंतर तीन हजाराहून अधिक जागा रिक्त – सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया