.…त्याबाबत मोदींनी महाराष्ट्रात घोषणा करावी”, संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “..तर आम्हाला आनंद होईल!”

राऊत म्हणतात, “गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीरमधून विस्थापित झालेले हजारो काश्मिरी पंडित जम्मूला येऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी…!”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर येणार असून बीकेसी मैदानावर त्यांची सभाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपा आणि शिंदे गटाकडून यासंदर्भात करण्यात आलेल्या विधानांवर विरोधकांकडून मात्र हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘शिवसेनेच्या काळात झालेल्या कामांचं उद्घाटन मोदी करत आहेत’, अशी टीकाही ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर खोचक शब्दांत तोंडसुख घेतलं आहे. तसेच, त्यांनी मोदींना सल्लाही दिला आहे.

हे वाचले का?  Maharashtra Weather Update: राज्यात पाऊस पुन्हा परतणार !

संजय राऊतांचा काश्मीर दौरा

संजय राऊत आज काश्मीरमध्ये राहुल गांधी यांच्यासह भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. “खरंतर राहुल गांधी महाराष्ट्रात आले, तेव्हा त्या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले. आता शेवटच्या टप्प्यात मी जातोय. हे अखंड भारताचं स्वप्न आहे. भारत काश्मीर ते कन्याकुमारी एक आहे आणि अखंड हिंदुस्थानावर शिवसेनेची पावलं उमटायला हवीत. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही यात्रेत सहभागी होतो”, असं राऊत म्हणाले.

“गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीरमधून विस्थापित झालेले हजारो काश्मिरी पंडित जम्मूला येऊन सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करेन”, असंही त्यांनी नमूद केलं.

हे वाचले का?  रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्डच नाही

“कर्नाटकला सूचना द्या”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत विविध विकासकामांच्या उद्घाटनासोबतच अनेक घोषणाही करणार असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राऊतांनी त्यांना सीमाप्रश्नी कर्नाटकला सूचना देण्याचा सल्ला दिला. “मोदींनी बेळगावसह सीमाभागात सुरू असलेल्या अत्याचारांबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात घोषणा करावी. ‘यापुढे बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका अशा सूचना मी दिल्या आहेत’ असं मोदींनी जाहीर करावं. त्याचा आम्हाला आनंद होईल”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“आज मोदी आम्ही केलेल्या कामांचंच उद्घाटन करत आहेत. यातल्या अनेक प्रकल्पांची योजना, पायाभरणी, सुरुवात ही शिवसेनेची महापालिकेत सत्ता असताना झाली आहे”, असाही दावा त्यांनी केला.

हे वाचले का?  लाडकी बहीण अभियानासाठी शुक्रवारी नाशिक विभागातून ९०० बस, प्रवासी वाहतुकीला फटका