दादा भुसे यांची ग्वाही
दादा भुसे यांची ग्वाही
नाशिक : अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून शासनापुढे शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानाची माहिती आपण ठेवणार आहोत. आपण आणि आपले सरकार या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत असून जे जे शक्य आहे ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
चांदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चांदवडचे आमदार डॉ. राहुल
आहेर हे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्यासाठी द्राक्ष बागांना भेट दिली.
त्यांचा दौरा सुरू असतानाच राज्याचे कृषिमंत्री हे महामार्गाने मुंबईला जात असल्याची माहिती आमदारांना मिळाल्यानंतर त्यांनी कृषिमंत्री भुसे यांना थांबवून नुकसान झालेल्या बागांची पाहणी करण्याची मागणी केल्यानंतर भुसे यांनी मुंबई-आग्रा महामार्गलगतच्या काही बागांना भेटी देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना धीर देत महाराष्ट्र शासन लवकरच या सर्वांचे पंचनामे करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले. शेतकरी दोन-तीन वर्षांपासून अशा संकटांना सामोरा जात आहे. शेतकऱ्यांनी आलेल्या संकटाला मोठय़ा धीराने सामोरे जावे, असे आवाहनही त्यांनी केले
आमदार आहेर यांनी चांदवड तालुक्यात असलेल्या अर्ली द्राक्ष बागांच्या स्थितीबाबत माहिती देऊन सुमारे ७० टक्के द्राक्षबागा बाधित झाल्याचे भुसे यांच्या निदर्शनास आणून दिले. ज्या भागामध्ये सप्टेंबर महिन्यातील द्राक्ष बागांची छाटणी केली आहे. त्या द्राक्षबागा अवकाळी पावसामुळे अडचणीत आल्या आहेत. निर्यातक्षम द्राक्षबागांची स्थिती आता मातीमोल भावातसुद्धा विक्री करता येणार नाही, अशी झाल्याचे त्यांनी सांगितले.
चांदवड तालुक्यातील धोतरखेडे येथे ईश्वर महाले यांच्या द्राक्षबागेची तसेच खडकजाम परिसरातील नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी दादा भुसे आमदार आहेर, उपविभागीय कृषी अधिकारी वाघ, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे आदींनी के ली.
शेतकरी ईश्वर महाले यांनी द्राक्ष शेतीला दिवसेंदिवस भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली.
आमदार आहेर यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत आणि सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन दिले.