पावसाळ्यात सुरक्षेचे नियम पाळा; वीज यंत्रणेपासून सतर्कतेचे महावितरणचे आवाहन

विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे.

नाशिक : पावसाळय़ात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीज तारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्किट आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावध राहावे, पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर सूचना व नियमांचे पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाने केले आहे.

विजांचा कडकडाट होत असेल तर सर्व विद्युत उपकरणे बंद करून ते मूळ वीज जोडणीपासून बाजूला करावे. आपल्या घरातील अर्थिग सुस्थितीत असावी आणि गरजेनुसार त्याची तपासणी करावी. जमिनीवर तुटून पडलेल्या वीज तारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणाऱ्या वीज तारांपासून सावध राहावे. तातडीने वीज कंपनीला त्याची माहिती द्यावी. पावसापासून बचाव करतांना आसपास जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी. त्यास हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. कपडे वाळविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तारांचा वापर टाळावा. कारण अनावधाने ही तार वीज प्रवाह असलेल्या तारांच्या संपर्कात आली तर मोठी दुर्घटना होऊ शकते. विद्युत उपकरणांना पाणी लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका, विद्यूत वाहिनीखाली किंवा जवळ कोणतेही बांधकाम करू नका, विद्युत खांब किंवा तणाव -ताराला गुरे ढोरे बांधू नका. विद्युत मीटरजवळ जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य बटण बंद करावे व जागा बदलून घ्यावी, याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त

तार तुटल्यास किंवा खांब पडल्यास तसेच बिघाड नेमका कोठे झाला, याची माहिती असल्यास वीज कंपनीला द्यावी, जेणेकरून तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल. मुख्य बटणात फ्युज वायरच असावी. घराच्या किंवा इमारतीच्या मुख्य बटणात व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्युज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्युमिनियम अलॉय ही विशिष्ठ धातूची तार वापरली पाहिजे. घरातील वायिरग जुने झाली असल्यास ती बदलून घ्यावी. घरात ओल येत असल्यास तसेच वायिरग जुनी झाली असल्यास गळतीमुळे वीज धक्क्याची समस्या वाढते. घर, उद्योग, कार्यालय, अथवा शेती असो वीज वापरतांना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

हे वाचले का?  नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे तुडुंब; धरणसाठा ५३ टीएमसीवर,२० धरणांमधून विसर्ग

विद्युत वायर, बटण, अथवा इतर उपकरणे ही आयएसआय प्रमाणित असल्याची खात्री करावी. वीज वापरात अर्थिग हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. अनेक अपघात हे योग्य प्रकारची अर्थिग न केल्यामुळे घडल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व वायिरग व्यवस्था तांब्याची थाळी वा पट्टी कार्यक्षमपणे लावून घेणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. पावसाळय़ात मीटररूममध्ये पाणी जाणार नाही त्याच बरोबर भिंती ओल्या होणार नाही याची काळजी घ्यावी. पूर किंवा अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत नागरिकांनी सहकार्य करावे,.असे आवाहन महावितरणने केले आहे.

ग्रामीण व शहरी भागांत तक्रार केंद्रे
वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीज पुरवठय़ात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा तक्रार देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. यासह महावितरणचे ॲप, संकेतस्थळ तसेच नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास किंवा नोपॉवर (स्पेस देऊन ) ग्राहक क्रमांक टाकून हा एसएमएस ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविल्या जातील, असे महावितरणने म्हटले आहे.