पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्यासाठी परीक्षार्थींसह काँग्रेसचे आंदोलन

आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.

पुणे : राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने स्पर्धा परीक्षार्थींसह पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे आंदोलन सुरू केले आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२३पासून राज्यसेवा परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात आतापर्यंत दोन वेळा काँग्रेसने आंदोलन केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षार्थींनी केलेल्या अराजकीय आंदोलनात गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२५पासून बदल करण्याची सकारात्मक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित बदल २०२५पासून लागू करण्याची आयोगाला विनंती केली.

हे वाचले का?  शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

त्यानंतर आयोगाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात स्पर्धा परीक्षार्थींनी २०२३पासूनच बदल लागू करण्याची मागणी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीनंतर आश्वासन नको अंमलबजावणी हवी म्हणत काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर काय निर्णय होणार याबाबत संभ्रम असून निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!