भारत-चीन तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्र्यांची रूपरेषा

दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत

भारत आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी आठ व्यापक तत्त्वांची आणि दोन्ही देशांनी कोणत्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे त्याची रूपरेषा मांडली. दोन्ही देश खरोखरच एकमेकांसमोर असून त्याचे परिणाम केवळ दोन देशांवरच नव्हे तर संपूर्ण जगावर होणार आहेत, असेही जयशंकर म्हणाले.

हे वाचले का?  Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी

पूर्व लडाखमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घडामोडींमुळे भारत आणि चीन यांच्यातील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले. चीनच्या भूमिकेतील बदल आणि सीमेवर सैन्याची जमवाजमव करण्यामागील कारणे याबाबत चीनने भारताकडे अद्याप विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही, असे जयशंकर यांनी एका ऑनलाइन परिषदेत सांगितले. गेल्या ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य पूर्व लडाखमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.

सीमा व्यवस्थापनाबाबत जे सर्व करार झाले आहेत त्यांचे कटाक्षाने पालन करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान राखणे, सीमेवर शांतता राखणे हा सर्व प्रकारच्या संबंधांचा आधार असावा, आदी तत्त्वांचा जयशंकर यांनी मांडलेल्या आठ व्यापक तत्त्वांमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे एकमेकांबद्दल आदर, संवेदना आणि हित या गोष्टींचे दोन्ही देशांनी पालन केले पाहिजे आणि याच तीन गोष्टी संबंध सुधारण्यास मदत करतील. उदयास येणाऱ्या शक्ती म्हणून प्रत्येकाच्या आकांक्षा आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री म्हणाले. चायना स्टडीजच्या १३ व्या अखिल भारतीय परिषदेत जयशंकर बोलत होते.