हसिना यांनी भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचे सांगितले.
भारत आणि बांगलादेशने गुरुवारी विविध क्षेत्रांत एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याबाबत सात करार केले आणि १९६५पर्यंत सुरू असलेली दोन देशांमधील रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याचाही निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील संबंध झपाटय़ाने सुधारत असल्याचे प्रतिबिंबित होत आहे.
चिलहाटी-हलदीबारी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याचा आणि हायड्रोकार्बन, कृषी आणि वस्त्रोद्योग यासह सात क्षेत्रांत एकमेकांना अधिकाधिक सहकार्य करण्याचे करार मोदी आणि शेख हसिना यांनी दूरदृश्य प्रणालीने झालेल्या शिखर परिषदेत केले.
राष्ट्रपिता म.गांधीजी व बांगलादेशचे संस्थापक मुजीबूर रेहमान यांच्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे मोदी आणि हसिना यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आले. चिलहाटी-हलदीबारी रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्यात आल्याने बांगलादेशातून आसाम आणि पश्चिम बंगालमधील संपर्कता वृद्धिंगत होणार आहे.
बांगलादेश हा भारताचा महत्त्वाचा शेजारी देश आहे त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याला आपले प्राधान्य आहे, असे मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर हसिना यांनीही भारत हा बांगलादेशचा सच्चा मित्र असल्याचे सांगितले.