मनोहर जोशी : सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले नेते

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानेच त्यांचा राजकीय आलेख कायम चढत्या क्रमाने राहिला.

लोकसभा अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेते, मुंबईचे महापौरपद, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अशी सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले मनोहर जोशी हे अपवादात्मक नेत्यांपैकी होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादन केल्यानेच त्यांचा राजकीय आलेख कायम चढत्या क्रमाने राहिला.

मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या विश्वासातील एक नेते. शिवसेनेच्या कोणत्याही निर्णय प्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे नेहमी जोशी यांच्याशी सल्लामसलत करीत असत. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात राज्यात कोठेही दौऱयावर जाताना बाळासाहेब आवर्जुन जोशी यांना बरोबर नेत असत. शिवसेनेच्या अष्टप्रधान मंडळात मनोहर जोशी यांचे स्थान वरचे होते. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मुंबई महानगरपालिकेत मित्र पक्षांच्या मदतीने शिवसेनेच्या वाट्याला महापौरपद मिळाले तेव्हा बाळासाहेबांनी मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या मामा-भाच्यांना संधी दिली. १९९० मध्ये शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळाले तेव्हा मनोहर जोशी यांच्या नावाला पसंती देण्यात आली. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपदावरून पक्षात पेच निर्माण झाला होता. सुधीर जोशी यांची मुख्यमंत्रीपद निवड करावी, अशी सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा होती. शिवसेना भवनासमोर जमलेल्या शिवसैनिकांनी तशी घोषणाबाजीही केली होती. पण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अखेर मनोहर जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “फोन आला अन् एक गाडी सोडली”; खेड-शिवापूर पाच कोटींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप

१९९९ मध्ये मनोहर जोशी हे लोकसभेवर निवडून आले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते. लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष बालयोगी यांचे विमान अपघातात निधन झाले. लोकसक्षा अध्यक्षपद मित्र पक्षाकडे कायम ठेवण्याचा निर्णय भाजपच्या नेतृत्वाने घेतला होता. लोकसभा अध्यक्षपदासाठी मनोहर जोशी यांचे नाव निश्चित झाले. लोकसभा अध्यक्षपदही त्यांनी यशस्वीपणे भूषविले. सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राहिल आणि सर्वांना समान संधी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यामुळेच जोशी सरांवर अध्यक्षपद भूषविताना सत्ताधाऱ्यांना केवळ संधी देतात, असा कधी आरोप झाला नव्हता.

नगरसेवक, महापौर, विधान परिषद आणि विधानसभेची आमदारकी, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष अशी विविध पदे मनोहर जोशी यांनी भूषविली होती. प्रत्येक पदाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजकारणात असतानाच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी रस घेतला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशन या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

शिवसेनेत सारीच सर्वोच्च पदे भूषविण्यास मनोहर जोशी यांना जशी संधी मिळाली तसेच शिवसेनेच्या अन्य नेत्यांची त्यांनी नाराजी पत्करली होती. १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली होती. शिवसेना सोडण्यास मनोहर जोशी कारणीभूत असल्याचा जाहीरपणे आरोप भुजबळ यांनी केला होता.

मुख्यमंत्रीपद भूषविताना पुण्यामध्ये जावयासाठी शाळेचे आरक्षण बदलल्याचा ठपका उच्च न्यायालयाने जोशी यांच्यावर ठेवला होता. पण तत्पूर्वीच त्यांनी मुख्ययमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २००४च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणखी महत्त्वाच पद भूषविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. राज्यसभेचे सभापतीपद म्हणजे उपराष्ट्रपतीपद मिळावी, असा त्यांचा प्रयत्न होता. पण लोकसभा निवडणुकीत मनोहर जोशी यांचा तेव्हा पराभव झाला आणि त्यानंतर कोणत्याच पदावर त्यांनी संधी मिळाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवाजी पार्कमधील जाहीर सभेत शिवसैनिकांनी जोशी सरांचा पाणउतारा केला होता. त्यामुळे त्यांना सभा अर्धवट सोडून जावे लागले होते. हा एक अपवाद वगळता मनोहर जोशी यांना शिवसेनेने कायमच मानाचे स्थान मिळाले.

हे वाचले का?  Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

मनोहर जोशी शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ट राहिले. शिवसेनेने आपल्याला भरभरून दिले ही कृतज्ञता मनोहर जोशी नेहमी व्यक्त करीत. कितीही महत्त्वाची पदे भूषविली तरीही दादर रेल्वे स्थानकाजवळील शिवसेनेच्या शाखेत सामान्य नागरिक किंवा शिवसैनिकांच्या भेटीसाठी ते उपलब्ध असत. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. मुख्यमंत्रीपद निवड झाल्यावर शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. पण या वादात पडण्याचे टाळून जोशी सरांनी शेवटपयर्यंत ठाकरे घराण्याशी एकनीष्ठ राहण्यावर भर दिला.