पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोलताना आमच्या डबल इंजिन सरकारने मुंबईचा विकास करुन दाखविला आहे. आता ट्रिपल इंजिन मुंबईत काय करणार हे पाहाच? असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोलताना आमच्या डबल इंजिन सरकारने मुंबईचा विकास करुन दाखविला आहे. आता ट्रिपल इंजिन मुंबईत काय करणार हे पाहाच? असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाची युती असताना हे तिसरे ‘इंजिन’ कुणाचे याची आता जोरदार चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, हे तिसरं इंजिन कोणतं? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे..
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या कार्यक्रमादरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन आपली भू्मिका स्पष्ट केली. दरम्यान, राज्यात आता डबल इंजिनचं सरकार आहे, असं मुलाखतकारांनी म्हणताच, राज्यात दोन नाही, तर तीन इंजिनचं सरकार असून आमचं सर्वात मोठं इंजिन हे दिल्लीत आहे, असं देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केलं.
माईक खेचल्याच्या आरोपावरही दिलं उत्तर
दरम्यान, मोदींच्या दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पंतप्रधानांच्या बाजुला जाऊन उभं राहायला सांगितलं होते. तसेच एका पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोरून माईक खेचला होता. यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे लक्ष्य करत सरकारचा रिमोट कंट्रोल फडणवीसांच्या हातात आहे, असा टोला लगावला होता. याबाबत विचारलं असता, ”तुम्ही पूर्ण व्हिडीओ बघितला. तर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदे उत्तर द्यायला लागले. तेव्हा पत्रकार म्हणाले, हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांसाठी आहे. त्यामुळे तो माईक मी माझ्यासमोर घेतला. मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. त्यामुळे काही गोष्टी मला माहिती आहेत. जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा सुरुवातील कुठं उभं राहायचं याची मला सुद्धा कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्या सहकाऱ्यांना सांगणं गैर काय आहे?” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.