.रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ, पावसाचा जोर वाढल्याने धरणात ४२ टक्के पाणीसाठा

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने, तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने, तसेच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने, लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. २८ प्रकल्पात ४२ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. रोहा तालुक्यातील सुतारवाडी आणि म्हसळा तालुक्यातील संदेरी आणि पाभरे अशी तीन धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत.

जून महिन्याच्या सुरुवातीला कोलाड येथील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पात २३ टक्के पाणी साठा शिल्लक होता. यातील ९ धरणांमध्ये दहा टक्क्यांहून कमी पाणी साठा शिल्लक होता. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे ढग दाटले होते. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाने ओढ दिल्याने परिस्थिती बिकट झाली होती.

हे वाचले का?  सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

मात्र गेल्या २० जून नंतर जिल्ह्यात मान्सुन पुन्हा एकदा चांगला सक्रिय झाला आहे. ज्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. धरणांच्या क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. २८.२६५ दशलक्ष घन मीटर पाणीसाठा या धरणांमध्ये जमा झाला आहे. अलिबाग तालुक्यातील श्रीगाव आणि मुरुड तालक्यातील फणसाड या दोन धरणांचा अपवाद सोडला तर इतर धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी ३ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. अन्य चार धरणामध्ये पंन्नास टक्केहून अधिक पाणी साठा झाला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत अजून वाढ होणे अपेक्षित असणार आहे. त्यामुळे हा पाऊस रायगडकरांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

कुठल्या तालुक्यात किती धरणे

रायगड जिल्ह्यात मुरुड (१), तळा (१), रोहा (१), पेण (१), अलिबाग (१), सुधागड (५), श्रीवर्धन (३), म्हसळा (२), महाड (४), कर्जत (२), खालापूर (३), पनवेल (३), उरण (१) या तेरा तालुक्यात २८ धरणे बांधली गेली आहेत. या धरणातून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. जिल्ह्यातील २८ धरणात ६८.२६१ दलघमी पाण्याच्या साठ्याची क्षमता आहे.

उपलब्ध पाणी साठा

० ते १० टक्के – फणसाड, श्रीगाव,

हे वाचले का?  Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

११ ते ३० टक्के – कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानवली, कोलते-मोकाशी, डोणवत, पुनाडे

३१ ते ५० टक्के – कार्ले, खैरे, मोरबे, बामणोली,

५१ ते ७५ टक्के – आंबेघर, कुडकी, भिलवले, उसरण

७६ ते ९९ टक्के – कोथुर्डे आणि वावा