शरद पवारांचं मिश्किल वक्तव्य, “मोदी म्हणाले मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात, मला बोटाची काळजी..”

पुरंदरच्या सभेत शरद पवार यांनी केलेलं वक्व्य चर्चेत, इस्रायल दौऱ्याचाही किस्सा सांगितला.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध शरद पवार असा थेट सामना रंगणार आहे. शरद पवार यांच्या घरात फूट पडली आहे. अजित पवारांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर शरद पवार हे सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. यावेळची निवडणूक ही वेगळी असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

पुरंदरच्या सभेत काय म्हणाले शरद पवार?

“लोकसभेची ही निवडणूक वेगळी आहे. आम्हाला काळजी आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा वापर अशा प्रकारे करत आहेत की निवडणुकीची प्रक्रिया या सरकारला नको. मुंबई महापालिकेची निवडणूक झालेली नाही. पंचायत समिती, नगर परिषद यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सगळ्या निवडणुका टाळायच्या आणि एका व्यक्तीने सगळा कारभार हातात घ्यायचा हे मोदींचं सूत्र आहे. ज्या दिवशी विधानसभा आणि लोकसभा याचाही कारभार असा सुरु झाला तर लोकशाही संकटात आलीच म्हणून समजा.”

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

मला माझ्या बोटाची काळजी वाटू लागली

“मोदी आणि माझे चांगले संबंध आहेत. मला एकदा ते म्हणाले की मला बारामतीला यायचं आहे. मी त्यांना म्हटलं जरुर या. मोदी आले, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि माध्यमांना म्हणाले, मी शरद पवारांचं बोट धरुन राजकारणात आलो. मला माझ्या बोटाची काळजी वाटू लागली.” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. मोदींचा लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. ज्यानंतर एकच हशा पिकला.

इस्रायलच्या दौऱ्याचा किस्सा

मी केंद्रात मंत्री होतो, तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. मला इस्रायलला जायचं होतं, केंद्र सरकारने मला ती जबाबदारी दिली होती. इस्रायल हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे माझा जायचा कार्यक्रम ठरला. मोदींना कळलं की मी इस्रायलला चाललो आहे. त्यावेळी त्यांचा मला फोन आला की मलाही यायचं आहे. तुमच्या शिष्टमंडळात माझाही समावेश करा. मी ठीक आहे म्हटलं. आम्ही इस्रायलला गेलो. दोन दिवसांच्या दौऱ्यात आम्ही शेतीचं निरीक्षण केलं. त्यानंतर मला मोदी म्हणाले की मी मागे थांबतो. मागे राहून त्यांनी काय केलं? याची चौकशी मी केली असता मोदींनी लष्करशाहीची शक्ती कशी आहे ? त्याची माहिती ते घ्यायला मोदी थांबले होते. आम्ही शेती बघायला गेलो होतो. यांनी ही पण माहिती मिळवली. कारण लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. असंही शरद पवार म्हणाले.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!

मोदी घटनेत बदल करणार

मध्यंतरी एक व्यक्ती आहेत, सरकारमध्ये राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले या निवडणुकीत तुम्ही आम्हाला विजयी करा. त्यानंतर मोदींना घटनेत बदल करणं सोपं जाईल. मोदींच्या सरकारमधले मंत्री जाहीरपणे सांगत आहेत की घटनेत बदल करण्यासाठी मोदींना निवडून द्या. त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेला मतदानाचा अधिकार उद्ध्वस्त होण्याचीच चिन्हं जास्त आहेत असंही शरद पवार यांनी पुरंदरच्या सभेत म्हटलं आहे.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा