सांगली : नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे स्थलांतर

सांगलीतील आरवाडे पार्क या नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे संजयनगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले.

लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : संततधार सुरु असलेला पाऊस आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे सांगलीतील आरवाडे पार्क या नागरी वस्तीत पूराचे पाणी शिरल्याने १७ जणांचे संजयनगर येथील निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आले. कृष्णेची पाणी पातळी सकाळी आठ वाजता २९ फूट ४ इंचावर पोहचली असून इशारा पातळी ४० तर धोका पातळी ४५ फूट आहे.

हे वाचले का?  रायगड जिल्ह्यात ७५ टक्के लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्डच नाही

चांदोली धरणातून वारणा नदीत आणखी विसर्ग आणखी वाढवला जाणार आहे. बुधवारी सकाळी ११.३० वाजता ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या ३८०० क्यूसेक विसर्ग सुरू असून त्यात वाढ करुन वक्र द्वार द्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला. पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून ९.३० वाजल्यापासून प्रति सेकंद २ लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे.