अर्थसंकल्पात रेल्वे तरतुदीत ३० हजार कोटींची वाढ ; केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांची माहिती

करोनाकाळात जगातील अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही आपल्या देशाने या संदर्भात प्रगती केली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

जालना : या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ३० हजार कोटी रुपये अधिक तरतूद आहे. राज्यासह देशातील विकासविषयक कामांना यामुळे चालना मिळणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी  म्हटले आहे.

गेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी एक लाख सात हजार कोटींची तरतूद होती. या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद एक लाख ३७ हजार कोटी आहे. देशभरातील सुरू असलेले रेल्वे प्रकल्प त्याचप्रमाणे मार्गाचे दुहेरीकरण, स्थानकांचा विकास, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण इत्यादींसह नवीन विकासविषयक कामांसाठी यामधून निधी मिळणार आहे. २०१४ पासून सरकारने कर वाढविले नसल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगारांसह उद्योगांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. करोनाकाळात जगातील अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही आपल्या देशाने या संदर्भात प्रगती केली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

हे वाचले का?  सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

केंद्रीय अर्थसंकल्प लघुउद्योजक, तरुण आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. कृषिमालाच्या हमी भावाच्या संदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत ८० लाख घरे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय सुविधा, सौर ऊर्जा प्रकल्प, वंदे भारत रेल्वेमार्ग, रस्ते इत्यादींसाठी करण्यात आलेली तरतूद जनतेस दिलासा देणारी असल्याचे लोणीकर यांनी म्हटले आहे.