“अहंकार नसेल तरच महाविकास आघाडी..”; पालकमंत्री छगन भुजबळ-सेना आमदाराच्या खडाजंगीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मदत वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आपत्कालीन निधीतून मदत देण्याच्या विषयावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात नांदगाव येथे आयोजित आढावा बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली होती. पण भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले होते. यावरून बैठकीत मोठा वाद निर्माण झाला होता. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचले का?  Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून दोघांना उमेदवारी जाहीर; शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, तर पंढरपूरमधून…

नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार यांच्यामध्ये वाद विकोपाला गेला आहे असा सवाल माध्यमांनी संजय राऊत यांनी केला. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. “काही वाद विकोपाला गेलेला नाहीये. दोन्हीही महाविकास आघाडीचेच लोकं आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडणून आलेले आमदार आहेत त्यांचाही सन्मान राखला गेला पाहिजे. छगन भुजबळ पालकमंत्री आहेत त्यांनी या आमदारांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. तरुण मुलं आहेत त्यामुळे सांभाळून घेतलं पाहिजे. चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?

काही दिवसांपूर्वी नांदगाव शहर आणि परिसरास मुसळधार पावसाचा फटका बसला होता. पुरामुळे शेतीसह शहरातील निवासी वस्ती, बाजारपेठेचे नुकसान झाले. यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पावसात शेतीसह व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. बंधारे फुटले, अनेक रस्ते खचले, वाहून गेले. या नुकसान भरपाईसाठी कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर नांदगावातील पूरग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीकडून पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेला आपत्कालीन निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी कांदे यांनी केली होती. पण, भुजबळ यांनी कांदे यांना शांत राहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन याविषयी निर्णय घेण्यात येईल. निधी मंजूर करण्यास काही मर्यादा असतात. अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागते, असे भुजबळ यांनी सांगितल्यानंतरळे सभागृहातील वातावरण बदलले. बैठकीला कांदे समर्थक उपस्थित होते. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. भुजबळ हे जनतेची दिशाभूल करीत असून बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. पण ते अनुपस्थित राहिल्याची तक्रार कांदे यांनी केली.