काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेचा कार्यक्रम स्थगित

दोन मार्च १९३० रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून लढा यशस्वी केला.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : गोदातीरावरील गौरी पटांगण येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहींना अभिवादनासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अभिवादन सभेचा नियोजित कार्यक्रम करोनामुळे तात्पुरता स्थगित करण्यात आला असून या कार्यक्रमाची पुढील तारीख लवकर कळविण्यात येईल, अशी माहिती काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपूत्र अभिवादन समितीचे स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि उपाध्यक्ष दामोदर जगताप यांनी दिली.

काळाराम मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोदावरी तीरावर गौरी पटांगण येथे असंख्य भीमसैनिकांसमवेत सत्याग्रह केला. दोन मार्च १९३० रोजी काळाराम मंदिरात प्रवेश करून लढा यशस्वी केला. या सत्याग्रहादरम्यान अनेक सत्याग्रहींनी आपले बलिदान दिले. या प्रसंगाचे स्मरण म्हणून शहीद सत्याग्रहींना अभिवादन करून त्यांच्या स्मृतीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समितीच्यावतीने स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षांपासून गोदातीरी अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. दरवर्षी दोन मार्चला हजारो भिमसैनिक येथे येऊन शहीद सत्याग्रहींना अभिवादन करतात. या अभिवादन सभेचे औचित्य साधून समितीच्यावतीने करोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, साहित्यिक, बौध्दाचार्य, कलाकार, गायक, सामाजिक कार्यकर्ते अशा ४७ करोना योध्दांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचे नियोजन होते. परंतु, शहरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने अभिवादन सभेतील नियोजित कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष घाटे आणि उपाध्यक्ष जगताप यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. नियोजित जागेवरील कार्यक्रमाची पुढील तारीख लवकर कळविण्यात येईल. या कार्यक्रमात युवा गायक संतोष जोंधळे तसेच कडूताई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुढील तारखेला हे दोन्ही गायक उपस्थित राहतील, असे समितीने म्हटले आहे.

हे वाचले का?  तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकमध्ये भक्तांची गर्दी

दरम्यान, करोना काळात प्रत्येकाने नियमांचे पालन करावे,  घराबाहेर पडताना मुखपट्टीचा नियमित वापर करावा, स्वत:च्या आरोग्यासह आपल्या परिवाराची काळजी घेऊन सुरक्षित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. याप्रसंगी समितीचे नंदकुमार जाधव, रोशन घाटे, विनायक वाघमारे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.