खाद्यतेल उद्योगासमोर सरकीच्या टंचाईचे सावट, जाणून घ्या काय होतील परिणाम?

यंदा कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योग सरकीच्या पुरवठ्याविषयी साशंक आहे.

पुणे : मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा कापसाच्या पेरणीत घट झाली आहे. बोगस बियाणे, बोंडअळीमुळे मागील काही वर्षांपासून सरासरी उत्पादनात घट होत आहे. यंदा कापसाला अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरविण्याची शक्यता असल्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योग सरकीच्या पुरवठ्याविषयी साशंक आहे.

देशात कापूस लागवडीखालील सरासरी क्षेत्र १२८ लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा नऊ जुलैअखेर ७६.१८ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. मागील काही वर्षांपासून बोगस बियाणे आणि लाल बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाच्या उत्पादनात घट होत आहे. मागील वर्षी १२ हजार प्रति क्विंटलवर असणारे दर, यंदा सरासरी ७ हजार ५०० प्रति क्विंटल राहिले आहेत. शेतकरी कापूस लागवडीकडे पाठ फिरवून तूर, मका आणि सोयाबीनकडे वळत आहेत. त्यामुळे सरकी खाद्यतेल उद्योगाला सरकीचा अपेक्षित पुरवठा होण्याबाबत खाद्यतेल उद्योगातील जाणकार साशंक आहेत.

हे वाचले का?  ‘आनंदाचा शिधा’ योजनेत पारदर्शकता; ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी संपुष्टात; ठेका मिळविण्यासाठी नऊ कंपन्या स्पर्धेत

सरासरी बारा लाख टन सरकीचे उत्पादन

देशात दर वर्षी सरासरी बारा लाख टन सरकीचे उत्पादन होते. हे सरकी उत्पादन सरकी तेल उद्योगाला वर्षभर पुरवून वापरावे लागते. नवा प्रकल्प उभारताना किंवा प्रकल्पांचा विस्तार करताना सरकीच्या अपुऱ्या पुरवठ्याचा विचार करावा लागतो. अपुरा पाऊस, बोगस बियाणे, बोंडअळी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी दरामुळे कापूस आणि सरकीच्या उत्पादनात सातत्याने घट होत आहे. सरकीचे घटते उत्पादन हा सरकी तेल उद्योगासाठी चिंतेचा विषय आहे. सरकीचे उत्पादन वाढल्यास देशांतर्गत सरकी तेलाचे उत्पादन वाढून देश खाद्यतेलाच्या बाबत आत्मनिर्भर होण्यास मदत होईल, असे मत द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) अध्यक्ष अजय झुनझुनवाला यांनी व्यक्त केले.

हे वाचले का?  Ganesh Visarjan Procession : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ

सरकीची उपल्बधता पाहून पुढचे पाऊल

देशात होणाऱ्या सरकीचे उत्पादन गृहीत धरूनच सरकी तेल उद्योग आपले नियोजन करीत आला आहे. पण, आता कमी होणारे सरकीचे उत्पादन आणि उद्योगातून वाढलेली मागणी याचा मेळ घालणे अवघड जात आहे. सरकीची उपलब्धता पाहूनच यापुढे नवे सरकी तेल प्रकल्प उभारण्याची गरज आहे, अशी माहिती द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (एसईए) माजी अध्यक्ष भारत मेहता यांनी दिली.