चार ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे वृत्त खोटे! चर्चेत राहण्याचा भाजपचा प्रयत्न, काँग्रेसची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की काही केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खोटा दावा केला आहे

नवी दिल्ली : भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाने (जीडीपी) चार हजार अब्ज डॉलरचा (चार ट्रिलियन) टप्पा ओलांडल्याच्या दावा केल्याबद्दल काँग्रेसने सोमवारी भाजपला टीकेचे लक्ष्य केले. केवळ बातम्यांचे मथळे निर्माण करून चर्चेत राहण्यासाठी भाजप अशा खोटय़ा बातम्या पसरवत आहे अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली.

हे वाचले का?  IPS भाग्यश्री नवटाकेंचा पाय आणखी खोलात? १२०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर नमूद केले, की काही केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हा खोटा दावा केला आहे. काल दुपारी दोन वाजून ४५ मिनिटे ते सहा वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान जेव्हा अवघा देश विश्वकरंडक क्रिकेटचा अंतिम सामना पाहत होता तेव्हा राजस्थान आणि तेलंगणशी संबंधित वरिष्ठ केंद्रीय मंत्री, मोदी सरकारचे अनेक समर्थक, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योजकांनी कालच भारताच्या ‘जीडीपी’ने चार ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडल्याबद्दल अभिनंदनपर ‘ट्वीट’ केले.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी  

त्यांनी आरोप केला, की ही निखालस खोटी बातमी वातावरण निर्मितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. खुशामतखोरीतून आणि चर्चेत राहण्यासाठी प्रतिमा उजळवण्यासाठीचा हा एक निराशाजनक प्रयत्न होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मंत्री किशन रेड्डी, उद्योगपती गौतम अदानी यांनी ‘एक्स’वर भारताच्या या कथित कामगिरीची प्रशंसा केली होती.