जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद; चार जखमी

कठुआ जिल्ह्यातील मचेडी भागात हा हल्ला झाला आहे. सायंकाळी दहशतवाद्यांनी एका टेकडीवरून अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जवान शहीद झाले असून चार जण जमखी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे अद्यापही लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कठुआ जिल्ह्यातील मच्छेडी भागात हा हल्ला झाला आहे. लष्कराचे पथक या भागातून जात असताना एका टेकडीवर लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार सुरु केला. तसेच हातगोळेही फेकले. या हल्ल्याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत चार जवान शहीद झाले, तर चार जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. रविवारी राजौरी भागातही दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यालाही लष्कराने चोख प्रत्यु्त्तर दिले होतं. मात्र, दशहतवाही येथून पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. याशिवाय गेल्या महिन्यात ११ आणि १२ जून रोजीही दहशतवाद्यांनी अशाप्रकारेच लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यांत सहा लष्कराचे जवान आणि एक स्थानिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

हे वाचले का?  “केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”