करोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षापासून शाळा बंद आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुलांच्या शाळांच्या मुद्यावरून एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, शाळा पुन्हा सुरू करण्यास आणि मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी बिलंब हा आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो.
राजन यांनी क्विंट ग्रुपचे सह-संस्थापक राघव बहल यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, . “मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेतजर तुम्ही दीड वर्षापासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल.”
“मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे.” असं राजन यांनी यावेळी बोलून दाखवलं.
मार्च २०२० मध्ये करोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतातील शाळा बंद आहेत. तर, या वर्षीच्या सुरूवातील देखील करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा सुरू करण्याबाबतचा विचारही फोल ठरला. यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे.
आता ऑनलाईन क्लासेस सर्वसामान्य झाले आहेत. यावर राजन यांनी सद्यस्थितीमधील डिजिटल विभाजनाच्या मुद्याकडे लक्ष वेधले कारण, अनेक मुलं उपकरणं किंवा इंटरनेटच्या अभावामुळे या ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होऊ शकलेले नाहीत. रघराम राजन असं देखील म्हणाले की, मुलांच्या या संपूर्ण पिढीचा विचार करा, यापैकी ३०-४० टक्के शिक्षण सोडून देतात, कारण, ते सहजतेने याला सामोरे जाऊ शकत नाहीत. ही एक मोठ्याप्रमावरील आपत्ती आहे.
तर, आता करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्याने, महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश व कर्नाटक आदी राज्यांमध्ये शाळा टप्प्याटप्प्यात सुरू होताना दिसत आहेत.