जितेंद्र आव्हाडांचं नरेंद्र मोदींना उत्तर, “ईव्हीएमवर लोकांचा विश्वास नाहीच, जनतेच्या मनात…”

लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे, मग तिच पद्धत तुम्ही आणत नाही? असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संसदीय नेतेपदावर निवड झाली. त्यावेळी त्यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला. तसंच यावेळी मला वाटलं होतं की ईव्हीएमची प्रेतयात्रा लोक काढतील असं मला वाटलं होतं असा टोला नरेंद्र मोदींना विरोधकांना लगावला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांना विचारलं असता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टोला काय?

“४ जूनचे निकाल लागत असताना मी माझ्या काही कामांमध्ये व्यग्र होतो. मला नंतर फोन येऊ लागले. मी त्यानंतर कुणाला तरी म्हटलं की ठीक आहे हे सगळं पण मला एक सांगा ईव्हीएम जिवंत आहे की मेलंय? या लोकांनी ठरवून टाकलं होतं की लोकशाहीवरुन लोकांचा विश्वास उडाला पाहिजे. यावेळी तर ईव्हीएमची प्रेतयात्रा निघेल असं वाटलं होतं. पण त्या ईव्हीएमनेच विरोधकांची तोंडं बंद केली. निवडणूक आयोग, लोकशाहीची ताकद त्यादिवशी सगळ्यांनाच कळली.” असं म्हणत नरेंद्र मोदींनी टीका केली होती. त्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचले का?  Ladki Bahin Yojana : ॲप आणि संकेतस्थळ बंद, लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भराल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

जितेंद्र आव्हाडांचं उत्तर काय?

“ईव्हीएमवर आमचा आणि जनतेचा विश्वास नाहीच. त्यामुळे त्यावर प्रश्न विचारले जाणारच. लोकशाहीत जनतेच्या मनात काय आहे त्याला जास्त महत्त्व आहे. ईव्हीएम मॅनेज होत नाही असं कुणी म्हणत असेल तर ते संपूर्णतः चुकीचं आहे. ईव्हीएम मॅनेज होतं. निवडणूक आयोगाने न्यायालयात सांगितलं की ईव्हीएम चार तासात निकाल कसे चुकले? रविंद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर यांचंच उदाहरण बघा. ईव्हीएम मध्ये कॅलक्युलेटर आहे त्यात चुका कशा होतात? लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे, तीच पद्धत आली पाहिजे. लोकांचं मतच मी सांगतो. विरोधी पक्षांनी लोकांना भ्रमित केलं, म्हणून तुमच्या विरोधात मतदान झालं का? असं झालेलं नाही, लोकांना पटलं नाही तर नाही. लोकांना अजूनही संशय आहे तर तो दूर करुन टाका. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या.” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

हे वाचले का?  Maharashtra Assembly Election 2024: नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात निवडणुका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले सूतोवाच!

संविधानाबाबत संशय कुणी निर्माण केला?

निवडणूक लढवत असणाऱ्या तुमच्या उमेदवारांनी सांगितलं आम्हाला अपेक्षित संख्या मिळाली तर संविधान बदलणार. संशय तुम्ही तयार केला आहात. लोकांना संशय आल्यानंतर लोकांनी मतदान केलं. महाराष्ट्रात मनुस्मृती आणण्याचे प्रयत्न झाले. दीपक केसरकर म्हणाले होते की काही श्लोक आणले तर बिघडलं कुठे? सरकारने मला पुढे करुन विषय दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र मी शांत बसणार नाही. मनुस्मृती आम्ही आणणार नाही हे केसरकर सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्नही आव्हाडांनी विचारला आहे.