जिल्हा बँक शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने देणार

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली.

नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या आज, मंगळवारी झालेल्या सभेत याला मंजुरी देण्यात आली. सध्या शेतकऱ्यांना शासनाचे व्याजदर परतावा धोरणानुसार तीन लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहीत मुदतीत केल्यास तीन लाखांच्या मर्यादेत अल्पमुदत पीककर्जे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे.

हे वाचले का?  सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

परंतु ३ लाखांच्या पुढील पीककर्जे शेतकऱ्यांना बँकेच्या प्रचलित १० टक्के व्याजदराने उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने आज बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत यावर चर्चा होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३ ते ५ लाखांपर्यंतच्या कर्जाचे व्याज बँकेच्या स्वभांडवलातून देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून जवळपास ३ लाख शेतकरी कर्जदार सभासदांना २ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी रक्कम १ हजार ७२६ कोटीचे कर्ज वाटप जिल्हा बँकेने केले  आहे. यातील वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे अध्यक्ष शेळके व उपाध्यक्ष कानवडे यांनी दिली.

हे वाचले का?  सात कोटींची जमीन फक्त ३.७५ लाखांत मिळाली; महिलेसाठी कायदेशीर लढा ठरला भलताच फायदेशीर!

शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.