नाशिक : पावसाला विलंब झाल्यास शहरात पाणी कपात, जिल्ह्यातील धरणांमध्ये २६ टक्के जलसाठा

पाणी बचतीच्या दृष्टीने अन्य पर्यायांवर भर देत गेल्या महिन्यात लांबणीवर टाकलेली शहरातील पाणी कपात जूनमध्ये पावसाने दडी मारल्यास लागू करणे क्रमप्राप्त ठरण्याच्या मार्गावर आहे.

नाशिक : पाणी बचतीच्या दृष्टीने अन्य पर्यायांवर भर देत गेल्या महिन्यात लांबणीवर टाकलेली शहरातील पाणी कपात जूनमध्ये पावसाने दडी मारल्यास लागू करणे क्रमप्राप्त ठरण्याच्या मार्गावर आहे. अल निनोच्या प्रभावाने पावसाळा उशिरा सुरू होण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविला गेला आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठा ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे नियोजन आहे. त्याकरिता आठवड्यातील एक दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागू शकतो. जूनच्या मध्यापर्यंत पाऊस न झाल्यास जलसाठ्याचा आढावा घेऊन कपातीवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

मागील काही वर्षात पाऊस अनेकदा प्रारंभी हजेरी लावून नंतर अंतर्धान पावल्याची उदाहरणे आहेत. या वर्षी तर खुद्द हवामान विभागाने पावसाळा उशिराने सुरू होण्याचा अंदाज दिलेला आहे. त्यामुळे शासनाने उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्टपर्यंत नियोजन करण्याची सूचना केली होती. त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर विचार झाला. महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस कपातीचा प्रस्ताव तयार केलेला आहे. परंतु, मे महिन्यात काळजी करण्यासारखी स्थिती नसल्याने थेट कपात केली गेली नव्हती.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया

पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली दर महिन्याला जलसाठ्याचा आढावा घेतला जातो. मागील बैठकीत त्यांनी जून, जुलैमध्ये परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल. तेव्हा कपातीची गरज भासल्यास नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. नळांना तोट्या बसविणे, जल वाहिन्यांची गळती रोखण्याची सूचना दिली गेली. नागरिकांना काटकसरीने वापर करून पाण्याची बचत करण्याचा आग्रह धरण्यात आला. पावसाची स्थिती पाहून आठवड्यातून एक दिवस कपात करावी लागेल की नाही, यावर विचार करावा लागणार आहे.

जूनच्या प्रारंभी काही भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. परंतु, जलसाठा उंचावेल, अशी स्थिती नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ७.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजही वातावरण मे महिन्यासारखेच आहे. अधुनमधून ढग दाटत असले तरी मान्सूनचे प्रत्यक्षात आगमन झालेले नाही. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या २१४४ दशलक्ष घनफूट (३८ टक्के) तर मुकणे धरणात २८३५ (३९) जलसाठा आहे. पाणी पातळी कमी झाल्यास गंगापूरच्या जॅकवेलमधून पाणी उचलताना अडचणी उद्भवतात. चारी वा तत्सम व्यवस्था करावी लागते. या स्थितीत गाळमिश्रित पाणी पुरवठ्याचा संभव असतो. पावसाळा लांबल्यास किंवा त्यात खंड पडल्यास पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान राहणार आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये पुढे ढकललेली पाणी कपात जूनमध्ये आणखी लांबविता येईल का, हा प्रश्न आहे.

हे वाचले का?  नाशिकमध्ये दुकानाला आग, वरच्या मजल्यावरील रुग्णालय सुरक्षित

दोन धरणे कोरडीठाक, पाचमध्ये अत्यल्प साठा

पाटबंधारे विभागाने लहान-मोठ्या २४ धरणांमध्ये १६ हजार ८५४ दशलक्ष घनफूट म्हणजे २६ टक्के जलसाठा असल्याचे जाहीर केले आहे. माणिकपूंज आणि नागासाक्या ही दोन धरणे कोरडीठाक झाली आहेत. तर आळंदी, वाघाड, तिसगाव, भावली, गौतमी गोदावरी या धरणांमध्ये चार ते १० टक्क्यांच्या दरम्यान म्हणजे अल्प साठा आहे. गंगापूर धरणात २१४४ दशलक्ष घनफूट (३८ टक्के), काश्यपी २८४ (१५), गौतमी गोदावरी १८५ (१०), आळंदी (आठ), पालखेड ३०५ (४७), करंजवण ७४२ (१४), वाघाड १६७ (सात), ओझरखेड ५५३ (२६), पुणेगाव ८९ (१४), तिसगाव १० (चार), दारणा २३०९ (३२), भावली १२५ (नऊ), मुकणे २८३५ (३९), वालदेवी २३९ (२१), कडवा ३८७ (२३), नांदूरमध्यमेश्वर २३४ (९१), भोजापूूर ५६ (१६), चणकापूर ६८२ (२८), हरणबारी ४१६ (३६), केळझर २०१ (३५), गिरणा ४३७१ (२४), पुनद ४५१ (३५), असा जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच सुमारास धरणांमध्ये २८ टक्के जलसाठा होता.

हे वाचले का?  नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या सुंदरतेसाठी स्थानिक वास्तूविशारदांचे सहाय्य