नाशिक: मंडळांना मागील वर्षाचेच क्रमांक; विसर्जन मिरवणूक रेंगाळल्यास कारवाई; पोलिसांचा इशारा

विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: गणेश विसर्जन मिरवणूक दरवर्षी संथपणे पुढे सरकत असल्याने अनेक प्रश्न उदभवतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि पोलीस यांच्यात झालेल्या बैठकीत मिरवणूक वेळेत, मंडळांच्या ठरलेल्या क्रमांकानुसार पुढे जाईल, याची ग्वाही मंडळांनी दिली. रेंगाळणाऱ्या मंडळावर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.

यंदा अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी येत आहे. मुस्लिम बांधवांनी सामंजस्य दाखवत या दिवशी ईदची मिरवणूक न काढता ती दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत मिरवणुकीतील सहभाग क्रमांकावरुन दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. मागील वर्षी सकाळी ११ वाजता मिरवणूक सुरू करूनही समारोपावेळी १३ क्रमांकाचे मंडळ मेहेर सिग्नलला होते. रेंगाळलेल्या मंडळांना पाठीमागचे क्रमांक देण्याची मागणी झाली. काही मंडळ आपल्या क्रमांकाच्या मागणीवर ठाम होते. त्यावरून अर्धा तास एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे झाल्यानंतर चिठ्ठ्या टाकण्याचा निर्णय झाला. चिठ्ठ्यांवेळीही मानाच्या गणपतीचा मुद्दा चर्चेत आल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाल्याने मंडळांच्या अध्यक्षांना वरिष्ठ निरीक्षकांच्या दालनात बोलावण्यात आले. तेथे मोजक्या पदाधिकाऱ्यांत चर्चा होऊन गतवर्षीच्याच सहभाग क्रमांकांना मंजुरी देण्यात आली.

हे वाचले का?  गणेश विसर्जनाची पर्यावरणस्नेही तयारी; नाशिकरोड विभागात फिरता तलाव, २९ नैसर्गिक विसर्जन स्थळे- ५६ ठिकाणी कृत्रिम तलाव

दरम्यान, बैठकीत मंडळांच्या क्रमांकांवरून काही वाद झाले. यावेळी २०२२ मधील २१ क्रमांकांची यादी सर्वानुमते मंजूर करण्यात आली. मिरवणूक सुरू होण्याआधी सकाळी १० वाजता मंडळे रांगेत जमतील, ११ वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. यावेळी एखादे मंडळ न आल्यास मागील मंडळ पुढे जाईल, असे ठरले. मुख्य चौकांत मंडळे फक्त १५-२० मिनिटे थांबतील. एखादे मंडळ रेंगाळल्यास कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला. मिरवणुकीत गुलाल, आवाजाच्या भिंती यांचा वापर होणार नाही, ध्वनिमर्यादेचे पालन होईल, ढोल पथकांमध्ये वादक संख्या मर्यादित असेल, अंतर पडलेल्या मंडळांवर उत्सवानंतर कारवाई, रात्री १२ वाजता मिरवणुकीचा समारोप, फक्त मूर्ती विसर्जनस्थळी नेणे, यावर बैठकीत एकमत झाले.

हे वाचले का?  मनोज जरांगे यांच्या शांतता फेरीची नाशिकमध्ये तयारी

गणेश मंडळांच्या मिरवणूक क्रमांकावरून काही वाद झाले. मागील वर्षाप्रमाणे ठरलेल्या क्रमांकानुसार मिरवणूक निघणार आहे. पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन मंडळांना बंधनकारक आहे. मिरवणूक मार्गावर ७० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून तीनहून अधिक ड्रोन फिरतील. याशिवाय थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यात येईल. ढोल पथकांना मुख्य चौकात प्रत्येकी २० मिनिटे थांबता येईल. – किरणकुमार चव्हाण (पोलीस उपायुक्त)

बैठकीत वाद

बैठकीत शिवसेवा मंडळ आणि युवक मित्र मंडळ मुंबई नाका या दोन मंडळांमुळे मिरवणूक रेंगाळत असल्याचा मुद्दा निघाला. पदाधिकाऱ्यांमध्ये क्रमांकावरून वाद झाला. त्यावेळी एका मंडळाने आपणास मागचा नंबर दिला तरी चालेल, असे सांगितले. क्रमांकासाठी नव्याने चिट्ठ्या टाकण्याची सूचना करण्यात आली. त्यावेळी पहिल्या दहापैकी कोणीही स्वत:चे क्रमांक सोडण्यास तयार झाले नाही.

सहभाग क्रमांकनिहाय मंडळे

नाशिक महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश (नाशिकचा राजा), सरदार चौक, रोकडोबा, शिवसेवा, शिवमुद्रा (मानाचा राजा), युवक मंडळ, दंडे हनुमान, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक पिंपळपार, वेलकम सहकार्य, गणेश मूकबधिर मंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठान, गजानन, महालक्ष्मी चाळ सोशल फाउंडेशन, उत्कर्ष मित्रमंडळ नाईकवाडीपुरा या क्रमांकानुसार मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.