नाशिक: मुक्त विद्यापीठाकडून ३० दिवसांच्या आत निकाल जाहीर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल यंदा ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत.

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल यंदा ३० दिवसांच्या आत जाहीर झाले आहेत. अत्याधुनिक स्कॅनिंग पध्दतीचा अवलंब करीत परीक्षा विभागाने विविध विषयांच्या एकूण २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी पार पाडली.

मुक्त विद्यापीठाचे बहुसंख्य विद्यार्थी नोकरी व व्यवसाय करीत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील उन्हाळी परीक्षाही २० दिवसांच्या अल्प काळात राज्यातील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपध्दतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल केवळ ३० दिवसांत जाहीर करण्यात आले. विद्यापीठाच्या ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. महाराष्ट्रातील ६०१ केंद्रांना ऑनलाईन व गोपनीय पध्दतीने १३०७ प्रश्नपत्रिका वेळेत उपलब्ध करीत परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. या परीक्षेसाठी विविध विषयांच्या २९ लाख नऊ हजार ८३१ उत्तरपत्रिकांपैकी उपस्थित विद्यार्थ्यांच्या २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची मोठी जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर होती.

विद्यापीठाने अत्याधुनिक स्कॅनिंग पद्धतीचा अवलंब करून सर्व उत्तरपुस्तिकांचे कालमर्यादेत स्कॅनिंग केले. महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या १०८ ऑनलाईन मूल्यमापन (कॅप) केंद्रावरील नियुक्त परीक्षकांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण व चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाच्या आधारे ओळखीची सत्यता पडताळली. उत्तरपुस्तिकांच्या मूल्यमापनाचे कामकाज विशिष्ट डिजिटल पध्दतीने पूर्ण करून निकाल जाहीर केले आहेत. परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. हे निकाल मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील निकाल शीर्षकाखाली विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. निकालाच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी २२ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. या संदर्भात विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध सूचनेनुसार कार्यवाही करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.

महत्वपूर्ण कामगिरी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे स्कॅनिंग पध्दतीचा अवलंब करून सर्व परीक्षांचे निकाल लवकर जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाकडून नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली. विद्यापीठाच्या ११० शिक्षणक्रमांसाठी २४२ सत्रनिहाय परीक्षांसाठी एकूण चार लाख ८९ हजार ६६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. २९ लाख नऊ हजार ८३१ उत्तरपत्रिकांपैकी उपस्थित विद्यार्थ्यांच्या २५ लाख १२ हजार २८४ उत्तरपत्रिका तपासून वेळेत निकाल जाहीर करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पार पाडली.