पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका

थंड आणि आल्हाददायक हवेसाठी प्रसिद्ध असलेली ही गिरिस्थाने अलीकडे ओस पडू लागली आहेत. वर्षभरात पर्यटकांची संख्या सोळा लाखांवरून थेट निम्म्यावर आली आहे.

सातारा : अवघ्या चार वर्षांपूर्वीपर्यंत महाबळेश्वरला वर्षाकाठी तब्बल १८ ते २० लाख पर्यटक भेट देत होते. ही संख्या हळूहळू रोडावत गतवर्षी अवघ्या साडेआठ लाखांवर आली आहे. काहीसे महागडे पर्यटन हे यामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले जात असले, तरी वर्षभरात दोन निवडणुका आणि नावीन्याचा अभावही पर्यटकसंख्या घटण्यास जबाबदार आहेत.

दरवर्षी उन्हाळी, पावसाळी हंगामासह दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वर-पाचगणी पर्यटकांनी बहरलेली असतात. नगरपालिकेकडील नोंदीनुसार करोना प्रादुर्भावापूर्वी (२०२० पर्यंत) येथे अठरा ते वीस लाख पर्यटक येत होते. पुढील दोन वर्षांत पर्यटनावर मर्यादा होत्या. करोनापश्चात, २०२३मध्ये महाबळेश्वरला १६ लाख २४ हजार २१७ पर्यटकांनी भेट दिली. पूर्वीच्या तुलनेत ही घट चार लाखांची होती. नुकत्याच संपलेल्या २०२४मध्ये आणखी घट होत हा आकडा आठ लाख ४८ हजार ५५५वर आला आहे. याबाबत माहिती घेतली (पान ४ वर)(पान १ वरून) असता, विविध कारणे पुढे आली आहेत. महाबळेश्वर, पाचगणी या दोन्ही स्थळांवरील वाढलेला खर्च हे मुख्य कारण असल्याचे अनेकांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत निवास, हॉटेलसह विविध सुविधांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेथे फिरताना विविध प्रकारचे स्थानिक करही द्यावे लागतात. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या कोकणातील पर्यटनस्थळांना आता अधिक पसंती मिळू लागली आहे. पर्यटनस्थळांमध्ये नावीन्यता नसणे, छोट्या रस्त्यांमुळे वारंवार होणारी वाहतूककोंडी हीदेखील पर्यटकांनी पाठ फिरविण्याची कारणे आहेत. ही येथील पर्यटन व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हे वाचले का?  Stampede Breaks Out at Maha Kumbh : मौनी अमावस्येला महाकुंभ येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; आजचे शाही स्नान रद्द!

पाचगणी, महाबळेश्वरच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. वाहतूककोंडी, नवनव्या करांमुळे पर्यटक त्रस्त होतात. व्यावसायिकांनीही पर्यटनवाढीसाठी सवलतीचे धोरण अवलंबणे आवश्यक आहे. यात सुधारणा न झाल्यास महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय धोक्यात येईल. – मेहुल पुरोहित, व्यावसायिक, पाचगणी

निवडणूक आचारसंहितांचा पर्यटनावर परिणाम झाला आहे. शिवाय हॉटेल, लॉज आणि आस्थापनांचा खर्च वाढल्याने त्याचा परिणाम पर्यटकांच्या खिशावरही होत आहे. वाढत्या खर्चाचा विचार करता पर्यटक नव्या पर्यटनस्थळांना पसंती देऊ लागले आहेत. – योगेश पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी, महाबळेश्वर पालिका

हे वाचले का?  उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

● गेल्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा निवडणुका पाठोपाठ झाल्या व त्या नेमक्या उन्हाळी आणि दिवाळी हंगामात आल्या.

● आचारसंहिता, नाकेबंदी यामुळे राज्यातील, तसेच परराज्यांतील अनेक पर्यटकांनी यंदा महाराष्ट्रात आणि महाबळेश्वरला येणे टाळले.

● उद्याोजक, व्यावसायिक येथे येताना रोखीने व्यवहार करत असतात. मात्र नाकेबंदीमध्ये रोख रकमेची कटकट नको, म्हणून अनेकांनी महाबळेश्वरला येणे टाळल्याचे सांगितले जाते.

हे वाचले का?  Guillain-Barré Syndrome Pune: पुणेकरांना पिण्याच्या पाण्याबाबत पालिका आयुक्तांचं ‘हे’ आवाहन; जीबीएसचा उल्लेख करत म्हणाले…

● कर्मचारीही अडकले निवडणुकांच्या कामात अडकल्यामुळे त्याचाही परिणाम यंदाच्या पर्यटकसंख्येवर झाला.