महाविद्यालयांमध्ये लशीचे २ डोस घेतलेल्यांनाच प्रवेश

विद्यार्थ्यांचे आठवडय़ाभरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची माहिती

कराड : विद्यार्थ्यांचे आठवडय़ाभरात शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश राहणार आहे. तर, लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. सामंत म्हणाले, की उद्या एक फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. पण, लशीचे दोन डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश राहणार असल्यानेच या विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचे आहेत. याबाबतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून, त्यांनी गतीने लसीकरण होण्यासाठी शिबिरे घ्यावीत. ठोसकृती करावी असे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. खासगी महाविध्यालयांसाठीही विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के लसीकरणाची सक्ती राहणार आहे. राज्यातील करोनाचा आढावा व कुलगुरुंशी बोलून १५ फेब्रुवारीनंतर पुढील परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायच्या याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, जॉइंट डायरेक्टर, डायरेक्टर यांना खर्च करण्याची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे. महाविद्यालयांमधील कंत्राटी कर्माच्याऱ्यांना किमान वेतनात वाढ देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.

हे वाचले का?  “केंद्रातील मोदी सरकार निगरगट्ट”, नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंचं टीकास्र; म्हणाल्या, “आम्ही शिक्षणमंत्र्यांचा…”

विधानसभेतील गैरवर्तनप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. तसाच न्याय राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातही व्हायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना आहे. आमदार नियुक्तीचा हा मुद्दा घेऊन आपण न्यायालयात जाण्याचा विचार करीत असून, त्याबाबत उद्या मुंबईत कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करून निर्णय घेणार आहे. त्यात राज्यपालांचा अनादर करण्याचा हेतू नसून भाजपाच्या निलंबित आमदारांना न्यायालयाचा जसा दिलासा मिळतो तसाच तो राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या प्रलंबित प्रकरणातही मिळायला हवा अशी आपली व्यक्तीगत भावना असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.