माफी मागत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी, फोनही बंद; कारण काय? वाचा…

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की “मी आज रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वतःचा फोन बंद करून अज्ञातस्थळी जाणार आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आमदार आणि विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड यांचा आज (५ ऑगस्ट) ६० वा वाढदिवस आहे. परंतु, आपण हा वाढदिवस साजरा करणार नसल्याचं आव्हाड यांनी जाहीर केलं आहे. तसेच ते अज्ञातस्थळी गेले आहेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांचा फोनही बंद केला आहे. आज दिवसभरात ते कोणाच्याही संपर्कात नसतील, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. वाढदिवस साजरा न करता अज्ञातस्थळी जाण्याबद्दल स्वतः आव्हाड यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

हे वाचले का?  Sujat Ambedkar on Raj Thackeray : “राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम…”, सुजात आंबेडकरांचं मोठं विधान; म्हणाले, “जोपर्यंत मुस्लिमांचे…”

जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की उद्या ५ ऑगस्ट… माझा वाढदिवस… लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकद मला तारखेला मिळते. पण मला माफ करा. या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.

आव्हाड यांनी म्हटलं आहे की, देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफूटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असं मला अजिबात वाटत नाही. तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशीर्वाद आहेत. हीच माझी ताकद आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरिही मला माफ करा. मी आज रात्री १२ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत स्वतःचा फोन बंद करून अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.

हे वाचले का?  “बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!

आव्हाड यांनी पुढे लिहिलं आहे की लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया माफ करा. मी उद्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचले का?  गणेशोत्सवातून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी; फलकबाजी, आरती संग्रह वितरण, ढोल-ताशा महोत्सव