
शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले.
लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली. जिल्ह्यात ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भात, डाळिंबाचा समावेश आहे. ८०६ गावांतील तब्बल ७६ हजार ५५८ शेतकऱ्यांना फटका बसला. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली.
परतीच्या पावसाने चांदवड आणि देवळा तालुक्यात हाहाकार उडवला. चांदवड तालुक्यात मातीचा बंधारा फुटल्याने गावातील लोकांना हलवावे लागले. नाशिक शहरासह कळवण, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अतिवृष्टीमुळे चांदवड तालुक्यात सर्वाधिक (१०९९२ हेक्टर), देवळा (८२३६), सटाणा (८८५३), पेठ (६२३०), इगतपुरी (१८३१), निफाड (८०७), येवला (१०७६), मालेगाव (९३५), नाशिक (७५०), कळवण (३४१), त्र्यंबकेश्वर ( ४३३), सुरगाणा (६६६), दिंडोरी (१०५) असे एकूण ३८ हजार ५५४ हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
कांदा (१२९६१ हेक्टर) व मक्याचे (११५८४) सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन (३२६), भात (९०४८, भाजीपाला (२९५८), कांदा रोपवाटीका (६४२), द्राक्षे (६२४), डाळिंब (४०८) हेक्टर नुकसान झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. ८०६ गावातील ७६ हजार ५५८ शेतकरी बाधित झाले. यात सटाणा (१७१३५), देवळा (१६१७८), चांदवड (१५९००) पेठ (१३१४७), इगतपुरी (३३२१), सुरगाणा (२६८३), नाशिक (२०२८), येवला (१४८७), त्र्यंबकेश्वर (११०४), कळवण (७६७), मालेगाव (५४९) शेतकऱ्यांचा समावेश आहे.
चांदवड तालुक्यात पावसाचे पाणी शिरून १०० घरे, ४६ दुकानांचे नुकसान झाले. तालुक्यात ३५ घरांची पडझड झाली. २३ जनावरे दगावली. देवळा तालुक्यात वेगळी स्थिती नव्हती. शहरातून जाणाऱ्या कोलथी, भावडी नद्यांसह तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली. ढगफुटीसदृश पावसाचा कापशी, भिलवाड, वाखारी आदी गावांना फटका बसला. सात घरांची पडझड तर, ४५ घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती देवळ्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.