मोठी बातमी! मनिष आणि ईश्वर जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, जळगावात खळबळ

गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून करण्यात येते आहे कारवाई

माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु झाली आहे. सराफा पेढ्यांचं आगार मानल्या जाणाऱ्या जळगावात या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई करण्यात येते आहे. स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या थकीत कर्जाज्या संदर्भात ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरु केली आहे.

हे वाचले का?  पक्षपातावरून खडाजंगी; अर्थसंकल्पातील राज्यांच्या अनुल्लेखामुळे ‘इंडिया’ आघाडी आक्रमक

ईडी पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी केली. ईडीकडून सर्व ठिकाणाच्या फर्मवर असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरु केली असल्याची माहिती समोर येते आहे

कारवाईमध्ये ईडीचे एकूण ६० कर्मचारी आणि अधिकारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत पहिल्यांदाचं ईडीचे पथक दाखल झाल्यानं सुवर्ण नगरीसह संपूर्ण जळगाव शहरात या कारवाईची चर्चा सुरु झाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या सहाशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज विषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जातं आहे. मागील वर्षीसुद्धा सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सचे चौकशी केली होती. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या चौकशीबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

हे वाचले का?  RBI Repo Rate: व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचं ‘आस्ते कदम’ चालूच; सलग दहाव्यांदा कोणतेही बदल नाहीत!