राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार; फैजपूरमध्ये शालेय शिक्षणमंत्र्यांची ग्वाही

शालेय पोषण आहारात रोज खिचडीऐवजी नवीन चांगले पदार्थ दिले जाणार असून आठवड्यातून एकदा अंडे दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव: सुरुवातीला शिक्षकांची ५० टक्के रिक्त पदे भरली जातील. आधार पडताळणीसंदर्भात असलेल्या अडचणी दूर झाल्यानंतर ८० टक्के रिक्त पदांची भरती करण्यात येईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शालेय पोषण आहारात रोज खिचडीऐवजी नवीन चांगले पदार्थ दिले जाणार असून आठवड्यातून एकदा अंडे दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

फैजपूर (ता. यावल) येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या ६२ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. विजय पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार शिरीष चौधरी, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, अधिवेशनाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, महेंद्र गणपुले, विजय पवार, सारथीचे संचालक विलास पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सचिन परदेशी, एजाज शेख आदी उपस्थित होते.

हे वाचले का?  नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

मंत्री केसरकर म्हणाले की, टप्पा अनुदानाच्या बाबतीत ३१ डिसेंबरपूर्वी निर्णय घेतला जाईल. पवित्र पोर्टलवरील रिक्त पदांच्या शिक्षक भरतीसाठी रोस्टर पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी रोस्टर पूर्ण करून ठेवावे. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांची भरती झाल्यानंतर लगेच खासगी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. २००५ पूर्वी नेमणूक झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. समूह शाळा व दत्तक शाळांचा उद्देश कोणतीही शाळा बंद करणे हे नसून, सर्व शाळांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळणे हे आहे. त्यामुळे याबद्दल गैरसमज करू नये. सर्व शाळांना शासकीय शाळेचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहे. असे जर झाले तर केंद्र सरकारकडून अनेक सुविधा सर्व शाळांना मिळतील.

हे वाचले का?  नाशिकमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज विविध कार्यक्रम

पुढील वर्षापासून व्यावसायिक शिक्षणावर भर दिला जाणार आहे, तसेच कृषी विषयाचा समावेश अभ्यासक्रमात केला जाणार आहे, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.पुढचे वर्ष हे विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे वर्ष आहे. सर्व जणांनी मिळून महाराष्ट्र शिक्षणात पहिल्या स्थानी येण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केली. सकाळच्या सत्रात सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे शोधनिबंध सादर करण्यात आला. त्याचा मुख्य विषय माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासात मुख्याध्यापकांची भूमिका हा होता. माजी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांचे माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक या विषयावर व्याख्यान झाले. राज्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ५४ मुख्याध्यापकांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आर. डी. निकम, प्रशांत वाघ, मनीषा पाटील, शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

हे वाचले का?  गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद