वंचितची लोकसभेला महाविकास आघाडीकडे १२ जागांची मागणी, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री म्हणाले…

संजय राऊत यांनी लोकसभेला २३ जागांची मागणी केली आहे, यावरही काँग्रेस नेत्याने आपलं मत व्यक्त केलं आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असल्याने त्यांची ताकद स्वबळ लढविण्याची राहिलेली नाही. काँग्रेसची मतदान घेण्याची ताकद दिसत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी १२ जागा वाटून घेण्याचे सूत्र ठरवावे, असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मांडलं होतं. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘मुंबई तक’शी संवाद साधत होते.

हे वाचले का?  दरड – पुराचा धोका लक्षात घेता सातारा जिल्ह्यात ७०० लोकांचे स्थलांतर

वंचित आघाडीनं १२ जागांची मागणी केलीय, त्यांनी तुमच्याबरोबर आलं पाहिजे, असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “निश्चितच वंचित बहुजन आघाडीनं मतांचं विभाजन टाळणे आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे. प्रकाश आंबेडकर आघाडीत येण्याबाबत सकारात्मक आहेत. अनेकवेळा आमची अनौपचारिक चर्चाही झाली आहे.”

संजय राऊत यांनी लोकसभेला २३ जागांची मागणी केली आहे, याबद्दल विचारल्यावर अशोक चव्हाणांनी म्हटलं, “संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची इच्छा व्यक्त केली आहे. याचा अर्थ तोच निर्णय होईल, असं सांगणं कठिण आहे. काँग्रेस कुठल्या जागा जिंकणार, याचा विचार करावाच लागेल. त्यातून मार्ग काढू. तिन्ही पक्षांची आघाडी आणि मित्रपक्षांचा समावेश हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत.

हे वाचले का?  फेसबुकवर रिल्स बनवून आमदार होता येत नाही.. शेकापचे माजी आमदार सुभाष पाटील यांची टीका

रेखा ठाकूर नेमकं काय म्हणाल्या?

“पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एकत्रपणाने निवडणूक लढवायची असेल तर प्रत्येकी १२ जागांचे सूत्र ठेवावे. अन्य कोणत्याही पक्षाची स्वबळावर लढण्याची ताकद राहिलेली नाही. १२ लोकसभेच्या जागांतील कोणती जागा कोण लढवणार यावर नंतर चर्चा होऊ शकते. पण सूत्र मात्र प्रत्येकी १२ असे असावे,” असे ठाकूर यांनी सांगितले.