“स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, त्यांचा अपमान…”, उद्धव ठाकरेंचा थेट राहुल गांधींना इशारा

“राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे…”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाने अपात्र ठरवलं आहे. यावर शनिवारी ( २५ मार्च ) राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे, गांधी कधी माफी मागत नाही,’ अशी टीप्पणी केली होती. यावरून आज ( २६ मार्च ) शिवसेना ( ठाकरे गट ) उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मालेगावच्या एमएसजी (मसगा) कॉलेजच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे उत्तर नाही आहे. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे काढत आहे. पण, भाजपा त्याला किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत.”

हे वाचले का?  नाशिक: मैत्रीपूर्ण लढतीची अजित पवारांना धास्ती, स्वकीय इच्छुकांचे प्रस्ताव धु़डकावले

“फक्त राहुल गांधींना एक सांगायचं आहे, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चालला. संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“सावरकरांनी १४ वर्षे छळ सोसला. ते सुद्धा एकप्रकारे बलिदान आहे. जसे क्रांतीकार फाशी गेले, गोळ्या खाऊन बलिदान दिलं. तसेच, १४ वर्षे मरण यातना सहन करण येड्यागबाळ्याचं काम नाही. त्यामुळे राहुल गांधींना सांगतो, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. त्याच्यात फाटे फुटू देऊ नका. मुद्दामन तुम्हाला डिवचलं जात आहे. आता वेळ चुकली, तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

हे वाचले का?  नाशिक : पालकमंत्री भुसे -भुजबळ प्रथमच समोरासमोर, लाडकी बहीण योजना आढावा बैठकीचे निमित्त