हनुमानाचा जन्म दोन्ही ठिकाणी! ; अंजनेरीसह किष्किंधाही जन्मभूमी असल्याचा शास्त्रार्थ सभेच्या अध्यक्षांचा निर्णय

स्वामी गोविंदानंद यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिकी रामायणानुसार किष्किंधाच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा पुनरुच्चार केला.

नाशिक  : नाशिककर तसेच किष्किंधावासियांनी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून किष्किंधा आणि अंजनेरी दोन्ही जन्मस्थळे पूजावीत, असा निर्णय येथे आयोजित शास्त्रार्थ सभेचे अध्यक्ष गंगाधर पाठक यांनी दिला.

दुसरीकडे किष्किंधा मठाधिपती स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी किष्किंधा हीच हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा करीत अंजनेरीला मानण्यास नकार दिला. काही दिवसांपासून त्र्यंबक येथे आलेले स्वामी गोविंदानंद यांनी कर्नाटकातील किष्किंधा हीच हनुमान जन्मभूमी असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. त्र्यंबक आणि नाशिकच्या संत, महंतांसह गावकऱ्यांनी अंजनेरी हीच हनुमान जन्मभूमी असल्याचे सांगितल्यावर गोविंदानंदांनी त्यासंदर्भातील पुरावे देण्याचे आव्हान दिले. त्यासाठी मंगळवारी नाशिकरोड येथे आयोजित शास्त्रार्थ सभेत वादविवाद होऊन प्रकरण हमरीतुमरीपर्यंत गेल्यानंतर सभा गुंडाळण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी स्वामी गोविंदानंद यांनी पत्रकार परिषदेत वाल्मिकी रामायणानुसार किष्किंधाच हनुमानाची जन्मभूमी असल्याचा पुनरुच्चार केला.

हे वाचले का?  नाशिक: पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेसला विलंब, रेल्वेला नोटीस