१० महिन्यात देशातील १० हजार ११३ कंपन्यांना लागलं टाळं; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी १० महिन्यात देशातील १० हजार ११३ कंपन्यांना लागलं टाळं; केंद्र सरकारने जाहीर केली आकडेवारी

लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तरामधून दिली माहिती

देशामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्याची माहितीसमोर आली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठं कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउन असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आकडेवारीसंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

सोमवारी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या असंही ठाकुर यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत सर्वाधिक तर पश्चिम बंगालमध्ये सर्वात कमी कंपन्या बंद झाल्या…

मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन हजार ३९४ कंपन्या बंद पडल्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या राज्यांच्या यादीमध्ये तामिळनाडू (१३२२ कंपन्या), महाराष्ट्र (१२७९ कंपन्या) आणि कर्नाटक (८३६ कंपन्या) या तीन राज्यांचा अव्वल पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे. त्याचबरोबर चंडीगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येक ४७९ कंपन्या, तेलंगणामध्ये ४०४ कंपन्या, केरळमध्ये ३०७ कंपन्या बंद पडल्या आहेत. याचप्रमाणे झारखंडमधील १३७ कंपन्यांना, मध्य प्रदेशमधील १११ कंपन्यांना आणि बिहारमधील १०४ कंपन्यांना एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये टाळं लागलं. इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांबद्दल बोलायचं झाल्यास मेघालयमध्ये ८८, ओदिशामध्ये ७८, छत्तीसगडमध्ये ४७, गोव्यात ३६, पुद्दुचेरीमध्ये ३१, गुजरातमध्ये १७, पश्चिम बंगालमध्ये चार तर अंदमान निकोबारमध्ये केवळ दोन कंपन्या बंद झाल्यात.

हे वाचले का?  Budget 2024 :पदकवीर दोघेच! अर्थसंकल्पात बिहार, आंध्रवर मेहेरनजर, महाराष्ट्र ‘कोरडा’च!, रोजगारनिर्मितीसा अनेक योजना

मुख्य कारण ठरलं लॉकडाउन

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने २०२० च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशभरामध्ये लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यामुळेच कंपन्यांना सर्व नियमांचे पालन करुन मे महिन्यापासून हळूहळू काम करण्यास सुरुवात करावी लागली. या लॉकडाउनमुळे कंपन्यांना मोठं नुकसान झालं. त्यामुळेच हजारो कंपन्यांनी आपला कारभार बंद केला.

हे वाचले का?  अन्यथा ‘लाडकी बहीण’ रद्द करू! सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा