Bharat Jodo Yatra 2.0: भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार! काँग्रेसने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अरूणाचल प्रदेश ते महाराष्ट्र असा या भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रवास असेल

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा याच वर्षी जानेवारी महिन्यात संपला. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरमध्ये संपली. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. लवकरच हा टप्पा सुरू होणार असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच ही यात्रा निघणार आहे.मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे. राहुल गांधींची ही यात्रा अरूणाचल प्रदेश ते महाराष्ट्र अशी असणार आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ‘मोहब्बत की दुकान’चा नारा दिला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ते काय नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हे वाचले का?  सात कोटींची जमीन फक्त ३.७५ लाखांत मिळाली; महिलेसाठी कायदेशीर लढा ठरला भलताच फायदेशीर!

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी काय घडलं आहे?

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी विरोधकांची आघाडी तयार झाली आहे. या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या तीन बैठकाही पार पडल्या आहेत. पहिली बैठक पाटणा, दुसरी बंगळुरू तर तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. तसंच या बैठकीत २७ पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू होण्याआधीच मणिपूरचं गंभीर प्रकरण घडून गेलं आहे. तसंच पावसाळी अधिवेशनही पार पडलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांची गेलेली खासदारकीही त्यांना परत मिळाली आहे. या सगळ्या मुद्द्यांचा समावेश या यात्रेत होऊ शकतो.

जुडेगा भारत जितेगा इंडिया

इंडिया हे नाव विरोधकांच्या आघाडीला दिल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ते इंडिया नाव जाऊन भारत हे नाव येण्याची. अशात काँग्रेसने जुडेगा भारत जितेगा इंडिया हा नारा दिला आहे. या नव्या नाऱ्याचे पडसादही नव्या टप्प्यात पाहण्यास मिळतील. तसंच विशेष अधिवेशनात सरकारने भारत हे नाव ठेवलं तर त्यावरूनही राहुल गांधी आणि काँग्रेस नेते टीका करण्यास सज्ज होतील.

हे वाचले का?  जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!

नाना पटोले यांनी काय म्हटलं होतं?

“राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे. तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे. कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील. असं आमच्या पदयात्रेचं नियोजन आहे”, अशी माहितीही नाना पटोले यांनी मागच्या महिन्यात दिली होती.