Guardian Minister : रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पद स्थगित केलं आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला.
दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावे १८ जानेवारी राजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नाही. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केली होती. दरम्यान, या गोंधळात आता नवा ट्विस्ट आला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला.

हे वाचले का?  Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”

आदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती

मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

हे वाचले का?  उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे सूतोवाच, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “फार टोकाची…”

गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती

गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.

२०२२ मध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील बंडखोरीला आदिती तटकरे यांचे पालकमंत्रीपद कारणीभूत ठरले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सहभागी झाला होता. त्यानंतर आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेना आमदारांनी मिळू दिले नव्हते. दोन वर्षे रत्नागिरीच्याच उदय सामंत यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. आता मात्र शिवसेना आमदांरांचा विरोध डावलून आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिले गेल्याने, महायुतीमधील असंतोष नव्याने उफाळून येण्याची शक्यता आहे.