INDW vs WIW: भारतीय महिला संघाने संपवला ५ वर्षांचा दुष्काळ, वेस्ट इंडिजला नमवत मिळवला विक्रमी टी-२० मालिका विजय

INDW vs WIW: भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करून मोठी कामगिरी केली. भारताने वेस्ट इंडिजचा ६० धावांनी पराभव करत अनेक वर्षांनी मायदेशात मालिका जिंकण्यात यश मिळवले.
INDW vs WIW T20I Series: भारताच्या महिला संघाने ऑस्ट्रेलियातील क्लीन स्वीपनंतर मायदेशात मालिका विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडिजच्या संघामध्ये टी-२० मालिका खेळवली गेली. मालिकेची विजयाने सुरुवात करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात यजमान टीम इंडियाने स्मृती मानधना आणि ऋचा घोष यांच्या फलंदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा पराभव करत मालिका २-१ ने आपल्या नावे केली. यासह टीम इंडियाने ५ वर्षांनंतर मायदेशात टी-२० मालिका जिंकली आहे.

हे वाचले का?  Stampede Breaks Out at Maha Kumbh : मौनी अमावस्येला महाकुंभ येथे चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती, अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता; आजचे शाही स्नान रद्द!

२०१९ नंतर, टीम इंडिया घरच्या मैदानावर द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. यापूर्वी, भारतीय महिला संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये घरच्या भूमीवर टी-२० मालिका जिंकली होती. या मालिका विजयासह भारताने खराब फॉर्मला मागे टाकत विजयाची चव चाखली आहे.स्मृती मानधना-ऋचा घोषची विक्रमी खेळी

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताची फलंदाज रिचा घोष (५४) आणि सलामीवीर स्मृती मानधना (७७) यांनी अप्रतिम खेळी खेळली. ऋचा घोषने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ चेंडूंमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली, तर मानधनाने मालिकेत सलग तिसरे अर्धशतक झळकावून २० षटकांच्या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५० अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

स्मृतीने तिसऱ्या टी-२० सामन्यातील अर्धशतकासह वर्षातील आठवे अर्धशतक झळकावून या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरली. यावर्षी २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर ७६३ धावा आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मृतीने श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूला मागे टाकले आहे.

हे वाचले का?  Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?

भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये २१७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली. भारताकडून स्मृती मानधनाने ७७ धावांची तर ऋचा घोषने ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर जेमिमा आणि राघवी बिश्त यांनी अनुक्रमे ३९ आणि ३१ धावांची शानदार खेळी केली. २१८ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्टइंडिजच्या संघाने ठराविक अंतराने विकेट्स गमावत १५७ धावा करण्यात यशस्वी ठरला.अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना ६० धावांनी जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. झंझावाती अर्धशतकासाठी रिचा घोषला सामनावीर आणि स्मृती मानधनाला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतले तर रेणुका ठाकूर सिंग, सजीवन सजना, तितास साधू आणि दिप्ती यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.