Modi 3.0: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘ही’ घटना; सत्ताधारी आणि विरोधकांमधील असहमतीचा परिणाम!

लोकसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये सहमती न झाल्यामुळे ही निवडणूक होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. ४ जून रोजी निकाल लागल्यानंतर काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ खासदारांचा शपथविधी पार पडला. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी होत आहे. देशभरातील खासदारांचे शपथविधी एकीकडे पार पडत असताना दुसरीकडे स्वतंत्र भारताच्या इतिहासातली पहिली घटना याच अधिवेशनात पाहायला मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच अधिवेशनात सत्ताधारी व विरोधकांमधील असहमतीचा परिणाम म्हणून या घडामोडी घडताना दिसत आहेत.

नेमकं काय घडतंय दिल्लीत?

राजधानी दिल्लीमध्ये मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलं अधिवेश चालू आहे. त्यात एकीकडे खासदारांचा शपथविधी होत असून दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदाबाबत मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपाप्रणीत एनडीएमध्ये माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याच नावावर याहीवेळी एकमत झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, ओम बिर्ला यांच्या नावावर सत्ताधारी व विरोधक यांचं एकमत होऊ शकलेलं नाही. इंडिया आघाडीकडून लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला. त्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चर्चाही झाली. पण त्यात एकमत होऊ शकलं नाही.

हे वाचले का?  Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

सत्ताधारी उपाध्यक्षपदाची मागणी मान्य करत नसल्यामुळे अखेर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काँग्रेसचे केरळमधील खासदार कोडिकुन्निल सुरेश यांचं नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर संसदेतील सर्वोच्च पदासाठीच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.

पहिल्यांदाच होणार अध्यक्षपदासाठी निवडणूक!

स्वतंत्र भारताचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहता यावेळी पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आत्तापर्यंत सत्ताधारी पक्षांच्या सहमतीने लोकसभा अध्यक्षपदावरील व्यक्तीचं नाव निश्चित करून त्या खासदारावर ती जबाबदारी सोपवली जात असे. सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाला विरोधकांचीही सहमती मिळत असे. यंदा मात्र विरोधकांनी केलेली उपाध्यक्षपदाची मागणी मान्य न झाल्यामुळे आता संसदेबाहेरील निवडणुकीनंतर संसदेच्या आतील निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

हे वाचले का?  अनुसूचित जाती, जमातींतही ‘क्रीमिलेयर’ हवे; घटनापीठातील चार न्यायमूर्तींची महत्त्वाची सूचना

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर काही विरोधी पक्षांच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर काँग्रेसचे वरीष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि द्रमुकचे ज्येष्ठ नेते टी. आर. बालू यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह, जे. पी. नड्डा. पियुश गोयल व लल्लन सिंह हेही उपस्थित होते.

नेमकी काय चर्चा झाली?

सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावर नेमकी काय चर्चा झाली, याबाबत पियुष गोयल यांनी माध्यमांना सांगितलं. “आज सकाळी राजनाथ सिंह यांची मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटायची इच्छा होती. पण ते म्हणाल की वेणुगोपाल राव त्यांच्याशी बोलतील. पण जेव्हा वेणुगोपाल राव व टी. आर. बालू यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्याच जुन्या मानसिकतेत ते असल्याचं दिसून आलं. आधी उपाध्यक्षाची निवड करावी, त्यानंतरच अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आम्ही आमचा पाठिंबा देऊ”, असं ते म्हणाल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं.

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी