NEET 2021 Paper Leak : जयपूरमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक, ८ जणांना अटक

रविवारी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान जयपूरमध्ये पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

जयपूरमध्ये NEET परीक्षा २०२१ चा (NEET Exam 2021 Paper Leak) पेपर लीक झाल्याचं प्रकरणं समोर आलं आहे. रविवारी १२ सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परीक्षेदरम्यान जयपूरमध्ये पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जयपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपर सकाळी २ वाजता सुरू झाला आणि पेपर २.३० वाजता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लीक झाला. या संपूर्ण प्रकरणात एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी उमेदवार धनेश्वरी यादवची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर इतरांना रिमांडवर घेण्यात आलं आहे.

हे वाचले का?  अहमदनगरची अक्षता जाधव अबॅकस परीक्षेमध्ये राज्यात दुसरी

कोचिंग संचालक नवरत्न स्वामी हे जयपूरमधील या पेपर लीकच्या संपूर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नीटच्या पेपर लीकचा हा व्यवहार ३५ लाख रुपयांमध्ये झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पेपर जयपूर येथील राजस्थान इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (RIET) नीट परीक्षा केंद्रातून लीक झाला आहे.

३८०० हून अधिक परीक्षा केंद्रे

देशभरातील ३८०० हून अधिक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या वर्षी नीट परीक्षेसाठी १६.१४ लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. नीट युजी परीक्षा प्रथमच १३ भाषांमध्ये घेण्यात आली आहे. पंजाबी आणि मल्याळम या भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत, पश्चिम आशियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कुवेतमध्ये देखील नीट परीक्षेकरिता (NEET) एक नवीन परीक्षा केंद्र उघडण्यात आलं आहे.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

एकूण १३ भाषांमध्ये परीक्षा

नीट परीक्षा ही आता हिंदी, पंजाबी, आसामी, बंगाली, ओडिया, गुजराती, मराठी, तेलगू, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजीमध्ये घेण्यात आली आहे. आपल्या माहितीसाठी, नीट परीक्षा ही याआधी १ ऑगस्ट रोजी होणार होती. परंतु, करोना स्थितीमुळे परीक्षा १२ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. ज्या शहरांमध्ये परीक्षा घेतली जाते त्यांची संख्या १५५ वरून २०२ इतकी झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही नीट २०२१ परीक्षा रविवारी घेण्यात आली.