Sanjay Raut : “मातोश्रीवर आलेले मुस्लिम लोक एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक, आम्ही..”; संंजय राऊत यांनी फोटो दाखवत केला ‘हा’ आरोप

संजय राऊत यांनी फोटो दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केला आहे.

Sanjay Raut – मातोश्रीवर वक्फ बोर्डाचा प्रश्न मांडत काही मुस्लिम लोकांनी आंदोलन केलं आणि घोषणाबाजी केली. हे सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते. ते लोक सोडून इतर सगळा मुस्लिम समाज आमच्याबरोबर आहे असा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे. तसंच राज ठाकरेंनाही खडे बोल सुनावले आहेत.

काय म्हणाले संजय राऊत?

आजकाल मुंबईत सुपारीचा कार्यक्रम चालला आहे. दिल्लीतून सुपारी दिली जाते, मग गोष्टी घडतात. मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्डाच्या मागणीसाठी असेच सुपारीबाज लोक आले होते. काहींनी पैसे देऊन आंदोलनासाठी या लोकांना पाठवलं होतं. वक्फ बोर्डासंबंधीचं विधेयक हे चर्चेसाठी आलेलं नाही. अजून चर्चा झाली नाही, कुणाची मतं कळली नाहीत. तेलगुदेसमने विरोध केला आहे. मातोश्रीच्या बाहेर हंगामा करण्यात आला. त्यातले अर्धे लोक गुन्हेगार होते. ही सुपारी कुणाची होती मी तुम्हाला दाखवतो. जे १० ते १२ लोक मातोश्रीच्या बाहेर घोषणा देत होते ते सगळे मुख्यमंत्र्यांचे लोक होते. असं म्हणत संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी फोटो दाखवून हा आरोप केला आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, भेटीचं कारण काय? राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री अब्दालीच्या सांगण्यावरुन सुपारी देतात

मातोश्रीवर जे लोक सुपारी देऊन धाडले गेले ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी असतात किंवा ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी असतात. अकबर सय्यद आंदोलन करत होता. तो मुख्यमंत्र्यांबरोबर आहे बघा. सलमान शेख हा कुणाबरोब आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर. त्यानंतर सिद्दीकी नावाचा माणूस हा पण एकनाथ शिंदेंसह असतो असं इस्तियाक सिद्दीकी मातोश्री बाहेर घोषणा देत होता तो मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर होता असाही फोटो संजय राऊत यांनी दाखवला. इलियास शेख मातोश्रीबाहेर घोषणा देत होता. हा मुख्यमंत्र्यांचा माणूस आहे. अक्रम शेख मातोश्री बाहेर होता, तो पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह होता. जे सगळे लोक मातोश्रीबाहेर आले होते आंदोलन आणि घोषणा देत होते. उद्धव ठाकरेंबाबत घोषणा देत होते ते सगळे लोक सुपारी गँगचे होते. ती सुपारी गँग वर्षा बंगल्यावर बसली. उद्धव ठाकरेंच्या विरोधात नारळ, अंडी, बांगड्या फेकणारे सुपारी गँगचेच सदस्य आहेत. त्यांचे म्होरक्या दिल्लीत बसलेत अहमदशाह अब्दाली असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बुरखा फाटला आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बुरखा फाटला आहे. तुम्हाला तमाशा करायचा आहे ना? आम्ही पण तुमचा तमाशा करु. एकनाथ शिंदेंचे भाडोत्री लोक मातोश्रीबाहेर नारेबाजी करत होते. सुपारी गँग मंत्रालय, वर्षा बंगला आणि ठाण्यातून चालवली जाते आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सगळे भाडोत्री लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पे रोलवर आहेत. बाकी सगळा मुस्लिम समाज महाविकास आघाडीबरोबर आहे असंही संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाहीत तर त्यांची सगळी फॅमिली सुपारीबाज आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुपारी गँगचे मुखवटे रोज फाडले जात आहेत असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे वाचले का?  Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk 2024 LIVE : लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

राज ठाकरेंना संजय राऊत यांनी काय सुनावलं?

सत्ता दोन महिन्यांनी आमच्या हातात येणार तेव्हा तुम्ही कुठे जाल ते आम्ही बघू. अहमदशाह अब्दाली महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये भांडणं लावतो आहे आणि सुपारी गँग त्याला बळी पडते आहे. बीडच्या घटनेशी आमचा संबंध नाही हे आम्ही अधिकृतपणे सांगितलं, शिवसेनेचा संबंध नाही. तरीही आम्हाला आव्हानं देत आहात. कुणाला आव्हान? तर बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला. काही हरकत नाही. आम्हाला मराठी माणसांमध्ये भांडण लावायचं नाही. कुणी भांडण लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. बघून घेऊ वगैरे धमक्या आम्हाला देऊ नका अहमदशाह अब्दालीला द्या. महाराष्ट्राची लूट करणाऱ्याला आव्हान द्या. सुपारी गँगला आव्हान देण्याची भाषा करा हिंमत असेल तर असा टोला संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी राज ठाकरेंना लगावला. सध्या आम्ही शांत बसलो आहोत. ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही तर आम्ही ते मान्यच करणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना त्यांनी (राज ठाकरे) आव्हान द्यावं. आम्ही तुरुंगात जातोय, ईडीपुढे आम्ही शेपट्या घातल्या नाहीत. अब्दालीचे लोक आमच्या अंगावर आले तेव्हा आम्ही घाबरलो नाही असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे वाचले का?  Manoj Jarange : “बेगडी उपोषण करण्यापेक्षा…”, आंदोलन स्थगित करताना मनोज जरांगे असं का म्हणाले?