Thackeray vs Shinde: रागावू नका पण अडीच वर्ष का लागली? सत्तांतरणासंदर्भातील नाना पाटेकरांच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, “आम्ही जर…”

याच प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्न सध्या सत्तेत असणाऱ्या या दोन्ही नेत्यांना विचारले. शिवसेनेमध्ये उभी फूट पडून बाहेर पडलेल्या शिंदे गट आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांना शिंदे आणि फडणवीस यांनी प्रश्नांइतकीच भन्नाट उत्तरं दिली. या मुलाखतीमध्ये सरकारमधून बाहेर पडायला अडीच वर्ष का लागले असा प्रश्नही नाना पाटेकरांनी विचारला. त्यावरही शिंदेंनी उत्तर दलं.

मुलाखतीच्या सुरुवातीलाच नानांनी, “कोणीही उत्तर द्यावं, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का?” असा थेट प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी, “आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते. तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील?” असा प्रतिप्रश्न केला. यावर नानांनी, “हे बोलण्यापुरतं झालं. एकदा मत दिल्यानंतर पाच वर्ष आम्ही खिजगणतीत नसतो का?” असा प्रश्न विचारला असता ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.

हे वाचले का?  महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “यावेळी काहीतरी…”

प्रेक्षकांनी टाळ्या वाजवताच नानांनी, “गैरसमज टाळा हा प्रश्न कोणाला अडचणीत आणण्यासाठी, टाळ्या मिळवण्यासाठी नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून मनात आलेले प्रश्न विचारतोय. एक मतदार म्हणून माझ्या मनात असतं की तुम्ही या या गोष्टी कराव्यात. उद्धव आणि तुम्हाला मत दिलं काय किंवा शरदरावांना दिलं काय किंवा इतर कोणालाही दिलं काय. मतदार म्हणून जे वाटतं ते तुम्ही केलं नाही तर आम्ही काय करायचं ते सांगा. पाच वर्षानंतर आम्ही करुच पण त्या आधी काय करायचं?” असा थेट प्रश्न नानांनी विचारला.

नानांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंनी, “नानांनी भावना व्यक्त केल्या ते अगदी योग्य आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी मतदारांचा आदार करुन जे काही करायचं ते केलं. जो आदर २०१९ मध्ये व्हायला हवं होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही शिवसेना-भाजपा युती म्हणून लढलो. मतदारांनी बहुमत दिलं. भाजपाचे १०० च्या वर आले आमचे ५६ आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं की बहुतमाप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल. पण दुर्देवाने तसं झालं नाही. पण आम्ही ते केलं तीन महिन्यांपूर्वी,” असं उत्तर दिलं.

हे वाचले का?  थोरात-विखे तिसऱ्या पिढीतील संघर्षाची झाली नांदी..; डॉ सुजय विखे व डॉ. जयश्री थोरात आमने सामने

शिंदेंच्या या उत्तरावर नाना पाटेकर यांनी, “रागावू नका पण अडीच वर्ष का लागली?” असा थेट सवाल केला. “अडीच वर्ष म्हणजे त्यासाठी योग, वेळ, काळ पाहिजे ना? मध्ये कोव्हिड होता. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो असतो तर कोव्हिड असताना का करताय वगैरे मुद्दे उपस्थित राहिले होते. आम्ही त्यांना सांगत होतो, समजावण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आम्हाला यश आलं नाही. म्हणून तुमच्या मतांचा आदर आम्ही तीन महिन्यांपूर्वी केला,” असं शिंदे म्हणाले.

याच प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. “नाना, कोव्हिड होता आणि सरकार फेसबुक लाइव्हवर तर बनवता येत नाही. त्यामुळे जसा कोव्हिड संपला तसे आम्ही एकत्र आलो आणि फिजिकल सरकार बनवलं,” असं फडणवीस म्हणाले. करोना कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा फेसबुक लाइव्हवरुन जनतेची संवाद साधला होता. रविवारीही उद्धव यांनी फेसबुकवरुन संवाद साधताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गटाचं नाव आणि चिन्हं म्हणून कोणते तीन पर्याय देण्यात आले आहेत याबद्दलची माहिती दिली होती.

हे वाचले का?  Rohit Pawar on Narendra Modi: “भटकत्या आत्म्याची भीती अजूनही…”, रोहित पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, “महाराष्ट्रात येणं…”!