Wayanad landslides Neethu Jojo: भूस्खलनाची पहिली माहिती देणारी ‘ती’ वाचू शकली नाही; वायनाडमध्ये त्या रात्री काय झालं?

Wayanad landslides : वायनाडच्या चुरलमला गावात पोहोचायला बचाव पथकाला बराच वेळ लागला. तोपर्यंत दुसरं भूस्खलन झालं आणि त्यात तिचा बळी गेला.

Wayanad landslides : देवभूमी अशी ओळख असलेल्या केरळमध्ये सध्या शोककळा पसरली आहे. पश्चिम घाटाला लागून असलेल्या निसर्गसंपन्न अशा वायनाड जिल्ह्यात निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. ३० जुलैच्या रात्री मेपाडी पंचायतीच्या चार गावांत भूस्खलन झाले. या दुर्घटनेत २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून, शेकडो लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जाते. मेपाडी भागात भूस्खलन झाले आहे, याची पहिली माहिती चुरलमला गावात राहणाऱ्या निथू जोजो यांनी दिली होती. ३० जुलैच्या रात्री १ वाजता भूस्खलन झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांत पाणी शिरले. रात्री दीड वाजता निथू जोजो यांनी वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (WIMS), मेपाडी येथे फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनंतर बचाव पथक रवाना झाले. पण, घटनास्थळी पोहोचेपर्यंत निथू जोजो वाचू शकल्या नाहीत.

३० जुलैच्या रात्री नेमके काय झाले?

निथू जोजो यांनी माहिती दिल्यानंतर बचाव पथक तत्काळ चुरलमला गावाच्या दिशेने निघाले; पण भूस्खलनामुळे चौफेर गाळ, दगडांचा ढिगारा पसरला होता. रस्तेही त्याखाली दडपले गेले. चुरलमला गावात बचाव पथक पोहोचेपर्यंत दुसऱ्यांदा भूस्खलन होऊन चुरलमला गावातील निथू जोजो त्यात दगावल्या. चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी (३ जुलै) निथू यांचा मृतदेह बचाव पथकाला मिळाला आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निथू जोजो कोण होत्या?

निथू जोजो यांनी ज्या वायनाड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला फोन करून भूस्खलन झाल्याची माहिती दिली. त्याच रुग्णालयात त्या काम करीत होत्या. या दुर्घटनेत संस्थेचे आणखी चार सदस्य मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेनंतर संस्थेतील एका सहकाऱ्याने निथू जोजोने नेमके काय सांगितले होते, याची माहिती दिली. त्या म्हणाल्या होत्या, “आम्ही संकटात आहोत. चुरलमलामध्ये भूस्खलन झाले आहे. आमच्या घरात पाणी शिरत आहे. कुणीतरी या ठिकाणी या आणि आम्हाला वाचवा.”

हे वाचले का?  IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

निथू जोजो यांच्या फोननंतर रुग्णालयाने अग्निशमन दल, सरकारी यंत्रणेला याची माहिती देऊन तत्काळ चुरलमलाच्या दिशेने धाव घेतली. आजूबाजूच्या चार गावांत पाणी शिरल्यामुळे बचाव पथकाला ठिकठिकाणांहून मदतीसाठी फोन येत होते. मात्र, रस्ते मातीच्या ढिगाऱ्याने लुप्त झाले होते. ठिकाठिकाणी झाडे मुळासकट उखडून पडली होती. त्यामुळे संकटग्रस्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला वेळ लागला.

दरम्यान, निथू जोजो यांच्या घरात त्यांचे पती जोजो जोसेफ, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा, तसेच त्यांचे पालक, शेजारपाजारचे लोक एकत्र झाले आणि घराबाहेर पडले. कारण- घरात थांबणे सुरक्षित नव्हते. गाळ आणि पाणी घरात शिरत असल्यामुळे निथू वारंवार मदतीसाठी फोन करीत होत्या. त्याचदरम्यान त्यांचे पती लहान मुलासह उंच जागेवर सुरक्षित ठिकाण शोधत होते.

पहाटे ४ वाजता दुसरे सर्वांत मोठे भूस्खलन

निथू जोजो मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होत्या; मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आधीपेक्षाही मोठे भूस्खलन झाले. भूस्खलनाचा गाळ वेगाने गावात शिरला. त्यासोबत मोठमोठे दगड-गोटे घरावर आदळू लागले. ज्या घरात निथू जोजो राहत होत्या, त्याही घरावर दगड-मातीचा ढिगारा कोसळला. दरम्यान, जोजो जोसेफ यांनी कुटुंबातील इतर सदस्य आणि काही गावकऱ्यांना कसेबसे सुरक्षित ठिकाणी हलविले; पण निथू कुठेच आढळून आल्या नाहीत.

हे वाचले का?  Manu Bhaker Won 2nd Bronze: मनूचे ऐतिहासिक दुसरे कांस्यपदक; सरबज्योतसह १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात यश

अखेर शनिवारी चिखल-मातीचा ढिगारा बाजूला करताना निथू जोजो यांचा मृतदेह आढळून आला. निथू जोजो यांनी सर्वांत पहिली माहिती दिली होती आणि त्यांनाच या दुर्घटनेत बळी ठरावे लागले, ही मोठी शोकांतिका ठरली. WIMS रुग्णालयाने निथू यांच्याखेरीज शफीना एम., दिव्या एस. या दोन परिचारिका व इंजिनीयर बिजेश आर. अशा कर्मचाऱ्यांना गमावले.

“… आम्ही निथूला विसरू शकत नाही”

निथू जोजो यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही निथूचा तो फोन कॉल कधीच विसरू शकत नाही. “आमच्या कर्मचाऱ्यांसाठी हा कठीण काळ होता. एका बाजूला रुग्णालयात मोठ्या संख्येने जखमी रुग्ण येत होते. तर, दुसऱ्या बाजूला आमचे सहकारी वाचतील, अशी आम्हाला आशा होती. मात्र, त्यापैकी काही जणांना नियतीने हिरावून घेतले. ही सल आमच्या मनात कायमची राहील.”

भूस्खलन झाल्यानंतर माणुसकीचेही स्खलन

भूस्खलन झाल्यानंतर सकाळी बचाव पथकाने सुरक्षेच्या कारणास्तव वाचलेल्या लोकांना घरातून बाहेर काढून निवारा केंद्रात हलविले होते. चार दिवसांनंतर जेव्हा नागरिक पुन्हा घरी परतले, तेव्हा त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू गहाळ झाल्या असल्याचे लक्षात आले. अनेक स्थानिकांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांनी केली. केरळच्या सर्वांत मोठ्या नैसर्गिक आपत्तीदरम्यान चोरांनी आपले उखळ पांढरे करून घेतल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. एका बाजूला निसर्गाच्या कोपामुळे भूस्खलन झाल्यानंतर वायनाडमध्ये माणुसकीचेही स्खलन झाल्याचे दिसले.

हे वाचले का?  NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर; ‘असा’ पाहता येणार निकाल!

बचावकार्याची व्याप्ती किती?

या दुर्घटनेत २१९ मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. तर, शेकडो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत. मेपाडी पंचायतीमध्ये भूस्खलन झाल्यानंतर मुंडक्काई, चुरलमला, अट्टामला व नूलपुझा ही गावे सर्वाधिक प्रभावित झाली होती. चारही गावांत गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यातून लोकांना शोधून काढण्यासाठी बचाव पथकाने आधुनिक रडार, ड्रोन अशी उपकरणे वापरली. गाळात अडकलेल्या लोकांच्या मोबाइलवर फोन करणे आणि टॉवर लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी विविध यंत्रणांचे १३०० जवान बचावकार्य करीत होते. ज्यामध्ये एनडीआरएफ, के-९ डॉग स्क्वॉड, लष्कर, विशेष तपास पथक, मद्रास इंजिनियरिंग ग्रुप, पोलीस, अग्निशमन विभाग, वन विभाग, नौदल आणि सागरी सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते.