“आज महाराष्ट्रात खूप मोठी क्रांतिकारक घोषणा होईल, लोक त्याला…” संजय राऊतांचं सूचक विधान!

“हा खूप मोठा संदेश आहे, पुढे महाराष्ट्रात आणखी खूप काही घडणार आहे.”, असंही म्हणाले आहेत.

अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना(ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज (सोमवार) करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात नव्या युतीची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेसाठी ठाकरे हे ‘आंबेडकर भवना’त जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्ममांना प्रतिक्रिया देताना सूचक विधान केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “आज दुपारी साडेबारावाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद आंबेडकर भवन, नायगाव, दादर (पूर्व) येथे होईल. महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे एक क्रांतfकारी पाऊल आहे. आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षांची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती जी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मोठ्याप्रमाणात आहे. त्या दोन विचारांची ही युती आहे आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचं खूप जूनं स्वप्न होतं.”

हे वाचले का?  सातारा : डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाखांचा दंड

याचबरोबर, “आज महाराष्ट्रात खूप मोठी क्रांतिकारक घोषणा होईल, लोक त्याला राजकारण म्हणू शकतात. राजकारण आहे तर राजकारण आहे. आज प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकारपरिषद आहे आणि दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा होईल. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे खूप मोठं, क्रांतिकारी पाऊल आहे.” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

याशिवाय, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र येणार आहेत. हा खूप मोठा संदेश आहे. पुढे महाराष्ट्रात आणखी खूप काही घडणार आहे.” असं सूचक विधानही यावेळी संजय राऊतांनी केलं.

हे वाचले का?  Creamy Layer : “अनुसूचित जातींचे आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट”, क्रिमीलेअरबाबत प्रकाश आंबेडकरांची सूचक पोस्ट

रामदास आठवले यांना बरोबर घेत शिवसेनेने शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग यापूर्वीही केला होता. आठवले भाजपबरोबर गेल्याने शिवसेनेने आता प्रकाश आंबेडकर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याचा महानगरपालिका निवडणुकीत फायदा करून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.