आता संसदेतही गाजणार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद! हिवाळी अधिवेशनात ठाकरे गट होणार आक्रमक

बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला.

बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असून शिंदे गट-भाजपा सरकार या मुद्द्याला हातळण्यास सक्षम नसल्याचा आरोप केला जात आहे. ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा धारण केला असून आम्ही आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हे वाचले का?  भारतात अनेक सिंगापूर निर्माण करण्याचा ध्यास; दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

आजपासून (७ डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरूवात झाली आहे. या अधिवेशानच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ठाकरे गटाकडून या प्रश्नाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. याबाबात बोलताना “हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. राज्यपालांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्यात आला. हा प्रश्न आम्ही अधिवेशनात उपस्थित करणार आहोत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नदेखील चिघळला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील अनेक गावांतील ग्रामस्थांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

“महाराष्ट्रातून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली जात आहे. वाहनं जाळली जात आहेत. महाराष्ट्रातील सीमाभागातील ग्रामास्थांना कर्नाटकमध्ये येण्याचे आमिष दाखवले जात आहे. कर्नाटक सरकारच्या याच भूमिकेविरोधात आम्ही सभागृहात आवाज उठवणार आहोत. आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात उद्धव ठाकरे गटाचे आम्ही सर्व खासदार संसदेचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत,” अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावर शिंदे गट-भाजपा सरकाला लक्ष्य केलं आहे. हे सरकार नामर्द आहे. आम्ही महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नच्या मुद्द्यावरून विरोधकांशी चर्चा करत आहोत. आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर जाण्यास तयार आहोत. तुम्हाला मला पुन्हा एकदा तुरुंगात टाकायचे असेल तर टाका, मात्र मी घाबरणार नाही. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे वाचले का?  Lockdown Effect on Moon : पृथ्वीवरील ‘कोविड लॉकडाउन’मुळे चंद्राच्या तापमानात घट; अभ्यासातील निष्कर्ष