इंजिनिअरिंगसाठी गणित-फिजिक्स विषय बंधनकारक न ठेवण्याचा निर्णय धोकादायक, वरिष्ठ शास्त्रज्ञांचा इशारा

“अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा निर्णय धोकादायक”

इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने(AICTE) काही दिवसांपूर्वीच नवं धोरण जाहीर केलं. यानुसार बारावीच्या विद्यार्थ्याने गणित, फिजिक्स, केमिस्ट्री हे तीन विषय घेतले नसतील तरीही त्याला इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण या निर्णयावरुन नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ व्ही. के. सारस्वत यांनी टीका केली आहे. सारस्वत हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) माजी प्रमुख होते.

अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र विषय बंधनकारक न ठेवण्याचा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा निर्णय धोकादायक आहे, असं सारस्वत म्हणाले. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊ शकतो असा इशाराही त्यांनी शुक्रवारी दिला. गणित आणि फिजिक्स हे दोन विषय कोणत्याही अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं सारस्वत यांनी नमूद केलं.

हे वाचले का?  सात कोटींची जमीन फक्त ३.७५ लाखांत मिळाली; महिलेसाठी कायदेशीर लढा ठरला भलताच फायदेशीर!

“बायोमेडिकल अभियांत्रिकी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या अभियांत्रिकी शाखांनाही गणित आणि भौतिकशास्त्र यांचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री विषय बंधनकारक नसणं हे धोकादायक ठरू शकतं, कारण यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचं बेसिक शिक्षणच मिळणार नाही”, असं सारस्वत यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात, एआयसीटीईने पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषांमध्ये बदल केला. गणित, भौतिकशास्त्र हे विषय अकरावी, बारावीच्या स्तरावर अभ्यासण्याचे बंधन शिथील करून तीन विज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यांनाही अभियांत्रिकी प्रवेशाची मुभा दिली. या निर्णयावर झालेल्या टिकेनंतर परिषदेने पात्रता निकष निश्चित करण्याची जबाबदारी राज्यांवर किंवा विद्यापीठांवर सोपवली. मात्र, नियम पूर्णपणे मागे घेतला नाही. त्यामुळे राज्यांनी स्विकारल्यास बारावीला गणित आणि भौतिकशास्त्र न घेणाऱ्या विद्याथ्र्यांना अभियांत्रिकीला प्रवेश मिळू शकतो. AICTE संस्थेने आता १४ विषयांची यादी जाहीर केली असून इंजिनिअरिंगमध्ये प्रवेशासाठी यादीतील १४ पैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान ४५ टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, जैवतंत्रज्ञान, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता या विषयांचा समावेश असेल. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी AICTE ने एक हँडबुक जारी केलं असून त्यातही याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.

हे वाचले का?  पहिल्या यादीत साडेचार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची निवड; सर्वांना शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रिया