इगतपुरीत सरासरी पावसात लक्षणीय घट, नाशिकमध्ये आतापर्यंत ७४८ मिलिमीटरची नोंद

घाटमाध्यावरील मुसळधार पावसाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत मात्र पावसाचे प्रमाण १०७८ मिलिमीटरने घटले आहे.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : १ जून ते २ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या ७४८ मिलिमीटर म्हणजेच ९८.१ टक्के पाऊस झाला आहे. १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद असताना घाटमाध्यावरील मुसळधार पावसाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत मात्र हे प्रमाण १०७८ मिलिमीटरने घटले आहे. पेठ आणि नाशिकमध्ये सरासरीपेक्षा काही प्रमाणात कमी पाऊस झाला आहे.

यंदाच्या हंगामात प्रारंभीचे एक ते दीड महिना अनेक भागात पावसाची प्रतिक्षा करावी लागली होती. या काळात घाटमाध्यावर अधूनमधून पाऊस कोसळला. परंतु, इतर भाग कोरडे राहिल्याने ऐन पावसाळ्यात शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ आली होती. ऑगस्ट महिन्यात चित्र पूर्णपणे बदलले. मुसळधार पावसाने कधी आठवडाभर तर, कधी सलग पाच दिवस हजेरी लावली. यामुळे कोरडीठाक पडलेली वा पडण्याच्या स्थितीत असणारी धरणे तुडुंब भरली. सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. प्रशासनाच्या माहितीनुसार एक जून ते दोन सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ७६२ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा त्यात काहिशी घट झाली. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९८.१ टक्के पाऊस झाला असून लवकरच तो सरासरी गाठण्याची शक्यता आहे.

हे वाचले का?  भूखंडाचे तुकडे करणाऱ्या प्रकल्पांची चौकशी; ‘म्हाडा’च्या पत्रानुसार नाशिक जिल्हा प्रशासनातर्फे समिती स्थापन

समीकरणांमध्ये बदल

यंदा पावसाची आजवरची समीकरणे पूर्णतछ बदलल्याचे दिसून येते. घाटमाध्यावरील भागात दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. आजही या भागात ती स्थिती असली तरी इगतपुरीत हे प्रमाण मात्र लक्षणीय कमी झाले. या तालुक्यात सरासरी २६६३ मिलिमीटर पाऊस पडतो, यंदा केवळ १५८५ मिलिमीटर (५९ टक्के) पावसाची नोंद झाली. म्हणजे सरासरीच्या तुलनेत जवळपास १०७८ मिलिमीटर कमी पाऊस झाला. पेठ तालुक्यात सरासरीच्या तुलनेत २०० मिलिमीटर कमी म्हणजे १५०७ मिलिमीटर (८७ टक्के) पाऊस झाला. नाशिक तालुक्यात ५४९ मिलिमीटर (९८.६ टक्के) पाऊस झाला. नाशिक आणि पेठ या तालुक्यांचा विचार करता इगतपुरीत पावसाचे प्रमाण सर्वाधिक घटल्याचे दिसून येते.

हे वाचले का?  नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

१२ तालुक्यांत सरासरी पार

हंगामात तीन तालुके वगळता इतर १२ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दुष्काळी व कमी पावसाच्या भागात त्याने जोरदार हजेरी लावल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. मालेगाव तालुक्यात आतापर्यंत ४७७ मिलिमीटर (१३७.९ टक्के), बागलाण ५७८ (१६२), कळवण ६४७ (१३०.७), नांदगाव ५१७ (१४३.८), सुरगाणा १५०७ (१०९.९), दिंडोरी ८९१ मिलिमीटर (१६४.८), निफाड ४२४ (१२८.३), सिन्नर ४७० (१२४.२), येवला ४३३ (१३१), चांदवड ६२१ (१५३.८), त्र्यंबकेश्वर १९४५ मिलिमीटर (१०२) आणि देवळा तालुक्यात ५४५.२ (१७७.५ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.