“उद्या जाहीर सभेत मी भांडाफोड करणार”, चिपी विमानतळ उद्घाटनापूर्वी नारायण राणेंचा इशारा!

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

राज्यात शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातले मतभेद आणि वैर सर्वश्रुत आहे. त्यात आता नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यापासून तर राणेंचा शिवसेनाविरोध अधिकच तीव्र झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होत असताना यावेळी जाहीर सभेमध्ये सत्ताधाऱ्यांचा आणि सिंधुदुर्गाच्या विकासाच्या आड येणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा केंद्रीय सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर आणि शिवसेनेचे सिंधुदुर्गातील खासदार विनायक राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

हे वाचले का?  Maharashtra News Live : “आचारसंहिता लागली, मनोज जरांगेंना आता निर्णय घ्यावा लागेल”, संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?

“तीनच गोष्टी बाकी होत्या, त्याही केल्या नाहीत”

“२०१४ साली मी विमानतळ बांधून पूर्ण केलं. तीनच गोष्टी बाकी होत्या. एक तर पाणीपुरवठा, महामार्गापासून विमानतळापर्यंत येणारा चौपदरी रस्ता आणि वीज या छोट्या गोष्टी होत्या. पण एवढ्या वर्षात त्याही केल्या गेल्या नाहीत. सिंधुदुर्गातलं नेतृत्व खुज्या वृत्तीचं आहे. आज हे विमानतळ सुरू होतंय. पण आता तेच पुढे राहून म्हणतायत आम्ही विमानतळ आणलं. मी जी विकासकामं सिंधुदुर्गात आणली, त्या सगळ्याला शिवसेनेनं विरोध केला. आता सांगतात आम्हीच केलं. भाषणं करायला तेच पुढे आहेत”, असं राणे म्हणाले.

“कावकाव करून काही मिळत नाही”

“उद्घाटनासाठी परवानगीही मीच आणली. यांना कुणी विचारतही नव्हतं. रोज तारखा जाहीर करत होते. मी सिंदियांकडे गेलो आणि तारखी निश्चित झाली. हे चकरा मारत होते. परवानगी मी आणली. यांची काय औकात आहे? यांना तिकडे कोण विचारतंय? कावकाव करून काही मिळत नाही. बुद्धीचा वापर करावा लागतो”, अशा शब्दांत नारायण राणेंनी शिवसेनेवर खोचक टीका केली.

हे वाचले का?  Ravikant Tupkar : “…तर सत्ताधारी नेत्यांना फिरणं मुश्किल होईल”, रविकांत तुपकरांचा सरकारला पुन्हा इशारा

“शिवसेनेची हफ्तेबाजी सुरू आहे”

दरम्यान, सिंधुदुर्गात शिवसेनेची हफ्तेबाजी सुरू असल्याची टीका राणेंनी यावेळी केली. “शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सिधुदुर्गातल्या उद्योगपतींना फार त्रास आहे. गाडी घेऊन दिल्याशिवाय त्यांनी रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू करू दिलं नाही. शिवसेनेची हफ्तेबाजी आहे ही. उद्या जाहीर सभेमध्ये सगळ्यांची नावं मी सांगणार आहे. विकासाच्या आड येणारी ही लोक आहेत हे मी सांगणार. त्यांचा भांडाफोड करणार”, असं राणे म्हणाले.